मुंबई – मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेऊन पावले उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत आहे. यामुळेच छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजप नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे, असे ट्विट कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
सचिन सावंत म्हणाले, मराठा आरक्षणावर आज कोणतीही स्थगिती नाही. तसेच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. तरीही विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मराठा आरक्षणासाठी 50 बलिदाने होत असताना उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने शपथपत्र दाखल करण्यास 3 वर्षे लावली आणि शिवस्मारकात गैरव्यवहार सुरू असताना गप्प राहणाऱ्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला आहे, असेही ट्विट त्यांनी केले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे आक्रमक झाले आहेत. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात राज्यभरातल्या 9 मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत झाली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मराठा आरक्षण मुद्द्यावरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही मेटेंनी दिला आहे.