Uddhav Thackeray On Ashok Chavan – आदर्श घोटाळ्याचा आरोप झालेले काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांना भाजपने त्यांच्या पक्षात सहभागी करून घेतल्याने सत्ताधारी भाजपही आता कोट्यवधींच्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातील भागीदार झाला आहे असा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आदर्श घोटाळ्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मूर्ख बनवण्यात आल्याचे सांगत भाजप चव्हाणांना आधी टार्गेट करत असे, पण आता तोच पक्ष त्यांना बरोबर घेऊन लोकांना मूर्ख बनवण्यात गुंतला आहे, असा आरोपही त्यांनी केला. नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (एमव्हीए) उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्रातील नांदेड येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आहेत ज्यात आवश्यक परवानग्या आणि मंजुरी न घेता संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या जमिनीवर दक्षिण मुंबईत ३१ मजली पॉश इमारत बांधण्यात आली होती. २०१४ मध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (सीबीआय) चव्हाण यांचे नाव या खटल्यातून हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु विशेष सीबीआय न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयाने हा प्रयत्न हाणून पाडला. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
आता चव्हाण यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भाजपने त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड केली. पण अजून आदर्श घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय होणे बाकी आहे. आता भाजपने अशोक चव्हाण यांना पक्षात सामावून घेत त्यांना राज्यसभा सदस्य केले आहे. त्यामुळे आता भाजपही आदर्श घोटाळ्यात सहभागी झाला आहे असे ठाकरे म्हणाले.
आता भाजपचे नेते चव्हाणांचे कौतुक करून लोकांना मुर्ख बनवत आहेत. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला नवी उभारी मिळाली आहे. नव्या नेत्यांच्या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केेले.