दारिद्य्र व रोगराई निर्मुलानासाठी गेली 20 वर्षे चांगले प्रयत्न
पाटणा : बिहार सरकारने गेली 20 वर्षे दारिद्य्र व रोगराईच्या निमुर्लनासाठी चांगले प्रयत्न केले असे कौतुगोद्गार मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी काढले आहेत. या प्रयत्नांमुळे फारच थोडा भाग सुधारला पण त्यांचे हे प्रयत्न चांगले होते असे त्यांनी म्हटले आहे. सध्या बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा या बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आमचे फौंडेशन बिहार मधील गरीब मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी काम करेल त्यासाठी आम्हाला सरकारचीही मदत लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. या राज्यातील सर्वच मुले आरोग्यदायी वातावरणात चांगले शिक्षण घेऊ शकतील ही आमची जबाबदारी आहे आणि त्या कामी आम्हाला राज्य सरकारही मदत करेल असा विश्वास गेट्स यांनी व्यक्त केला.
या फौंडेशनच्या मदतीने आम्ही येथे चांगले काम करू, त्यांनी आम्हाला जो मदतीचा हात दिला त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री व बिल गेट्स यांच्यात बिहार मध्ये चांगली आरोग्य सेवा व शिक्षणाच्या सोयी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. बिहार सरकारने वातावरणातील बदलाच्या विरोधात जल-जीवन-हरियाली हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची माहितीही नितीशकुमार यांनी त्यांना दिली आहे.