नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक २०२४ अनेक अर्थांनी रंजक होत आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या सुमारे दहा महिने आधीच विरोधकांच्या युतीचे प्रयत्न सुरू झाले होते. युतीबाबत विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे २३ जून २०२३ रोजी झाली. त्याच वेळी, २०१९ ते २०२२ या वर्षात एनडीएमधील अनेक घटक पक्षही फुटले आणि त्यांना परत आणण्याचे प्रयत्नही विरोधी आघाडीच्या घोषणेने सुरू झाले. तथापि, विरोधी पक्षांच्या सर्व प्रयत्नांनंतरही, काही राज्यांमध्ये इंडिया आघाडी अद्याप निश्चित झालेली नाही. त्याचवेळी एनडीएचा भाग असलेले अनेक पक्ष सत्ताधारी आघाडीत परतले आहेत.
कर्नाटकात एचडी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपी आणि बिहारमध्ये नितीशकुमार यांचा पक्ष जनता दल एनडीएमध्ये परतले आहेत. हे तिन्ही पक्ष पूर्वी कधीतरी एनडीएचा भाग होते. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते जवळपास ५० वर्षांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत या पक्षांनी ‘इंडिया आघाडी’पेक्षा एनडीएची निवड का केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जनता दलापासून अलग जेडीएसची स्थापना
१९९६ मध्ये, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळल्ल्यानंतर, देवेगौडा संयुक्त आघाडीच्या वतीने पंतप्रधान झाले. १९९९ मध्ये वाजपेयींच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव एका मताने गमावला तेव्हा भाजपला पाठिंबा देण्याच्या नावाखाली तत्कालीन जनता दलात फूट पडली. शरद यादव आणि रामविलास पासवान यांना एनडीएसोबत जायचे होते. देवेगौडा कोणत्याही परिस्थितीत एनडीएला पाठिंबा देण्याच्या बाजूने नव्हते. त्यांनी जुलै १९९९ मध्ये जनता दल सेक्युलरची स्थापना केली. पुढे जेडीएसनेही कर्नाटकात भाजपशी युती करून सरकार स्थापन केले. मात्र, जेडीएस आणि भाजपची युती तुटली. गेल्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती आणि पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
गेल्या दोन दशकांत देवेगौडा यांचा पक्ष कर्नाटकच्या राजकारणातही किरकोळ झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसची कामगिरी अत्यंत खराब होती. अशा परिस्थितीत जेडीएसने इंडिया आघाडीऐवजी एनडीएचा पर्याय निवडला. देवेगौडा यांचा काँग्रेसचा अनुभव कधीच चांगला राहिला नाही.
चंद्राबाबू नायडू यांना एनडीए का जास्त आवडला?
आंध्र प्रदेशच्या राजकारणात दीर्घकाळ दबदबा असलेले चंद्राबाबू नायडू १९९९ ते २००४ आणि २०१४ ते २०१९ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. दोन्ही वेळा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपचा पाठिंबा मिळाला. भाजपसोबतची युती तोडल्यानंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ मध्ये नायडू यांची काँग्रेससोबतची आघाडीही यशस्वी झाली नाही. वायएस राजशेखर रेड्डी नायडूंना राज्यात जोरदार आव्हान देत आहेत, अशा परिस्थितीत त्यांना एनडीएशी जुळवून घेणे चांगले वाटले. आंध्र प्रदेशात भाजपला मताधिक्य आहे, असे निवडणूक समीकरण जाणणारेही मानतात. वायएस राजशेखर रेड्डी यांच्या बंडानंतर आणि तेलंगणा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर आंध्र प्रदेशात काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे.
नितीशकुमारांनी का घेतला यू-टर्न?
2०२३ मध्ये नितीश कुमार हे विरोधी आघाडीचे सर्वात मोठे समर्थक म्हणून पाहिले जात होते. त्यांच्याच पुढाकाराने २३ जून २०२३ रोजी पाटणा येथे सर्व विरोधी नेते एकत्र आले. नितीश कुमार यांनी देशभरात जाऊन सर्व विरोधी नेत्यांची भेट घेतली आणि भाजपच्या विरोधात प्रत्येक जागेवर समान उमेदवार उभा करण्याबाबत बोलले. आणीबाणीच्या काळातही नितीशकुमार सक्रिय होते. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९७४ ते १९९४ पर्यंत त्यांनी समाजवादी पक्षांसोबत राजकारण केले. १९९५ नंतर ते एनडीएचे मित्र बनले. नितीश कुमार यांचा पक्ष जवळपास दोन दशके एनडीएचा भाग होता.