एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या क्लायमॅक्सप्रमाणे लांबलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर पूर्ण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला या निवडणुकीमध्ये सत्ता मिळाली आहे. मतमोजणीचा दिवस जरी एखाद्या घड्याळाच्या लंबकाप्रमाणे इकडून तिकडे होत असला तरी अखेर मतदारांनी विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कौल दिला आहे.
निवडणुकीतील लढती, प्रचार दौरे आणि अनुषंगिक मुद्दे यांची आतापर्यंत जोरदार चर्चा झाली आहे; पण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने बहुतेक सर्वच राजकीय पक्षांना मतदारांनी आत्मचिंतन करण्याचा संदेश दिला आहे, हे विसरून चालणार नाही. या निवडणुकीत विजयी झालेले पक्ष असोत किंवा पराभूत झालेले पक्ष असो प्रत्येक पक्षाने विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन व चिंतन करून स्वतःच्या पक्षाच्या बांधणीमध्ये आणि धोरणांमध्ये बदल करण्याचा धडा निवडणुकीच्या निकालाने दिला आहे.
नितीशकुमार यांच्यापुरते बोलायचे झाल्यास “आपली ही निवडणूक शेवटची असेल’, अशी घोषणा त्यांनी आधीच केली होती. त्यामुळे केवळ नितीशकुमार यांच्या खांद्यावरच आणि अस्तित्वावरच उभा असलेल्या जनता दल युनायटेड या पक्षाचे पुढे काय होणार, याचाही विचार आतापासूनच करावा लागणार आहे. या निवडणुकीत जनता दल युनायटेडला पूर्वीपेक्षा कमी जागा मिळाल्या. भाजपने आपल्या जागा मोठ्या प्रमाणात वाढवल्या. साहजिकच बिहारमध्ये आता या आघाडीमध्ये भाजपला मोठ्या भावाची भूमिका मिळाली आहे. भाजपाच्या सहकार्यानेच नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत. याची जाणीव त्यांना आणि त्यांच्या पक्षाला कायमस्वरूपी राहणार आहे. अशा परिस्थितीत बिहारमधील एक प्रमुख आणि समाजवादी विचारसरणीची बांधीलकी मानणारा राजकीय पक्ष आगामी काळात आपल्या पक्षाची पर्यायी नेतृत्वाची कशी बांधणी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा खूप जागा जास्त जिंकून भाजपने चांगली कामगिरी केली असली तरीही त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. निवडणूकपूर्व कराराप्रमाणे नितीशकुमारच मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार आहेत. महाराष्ट्रात ज्या प्रकारे अट्टाहासामुळे भाजपने सत्ता गमावली त्याप्रकारे बिहारमध्ये होऊ नये, याची जाणीव असल्यानेच भाजप यावेळी कोणतेही आढेवेढे न घेता नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पदावर बसण्यास परवानगी देईल. या निवडणुकीत भाजपचा दीर्घकाळचा मित्र रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. भाजप आपल्या “शतप्रतिशत भाजप’ या धोरणामुळे अनेक मित्र गमावत आहे. नितीशकुमार यांच्यासारखा चांगला मित्र गमावला जाऊ नये म्हणून भाजप या वेळी कोणताही धोका पत्करणार नाही; पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अद्यापही ताकद आहे आणि थोडे जास्त प्रयत्न केले, तर बिहारसारख्या राज्यात भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते, हा विचार भाजप नेतृत्वाच्या डोक्यात आणण्याचे काम या निवडणुकीने केले आहे.
बिहारची विधानसभा निवडणूक असो किंवा याच वेळी झालेली विविध राज्यांतील विधानसभेची पोटनिवडणूक, या सर्वच निकालांनी कॉंग्रेसला सर्वात जास्त आत्मचिंतन करण्याचा धडा दिला आहे. ज्या बिहार राज्यात कॉंग्रेसची दीर्घकाळ सत्ता होती त्या राज्यांमध्ये आज कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील सर्वात जुना आणि मोठा पक्ष मानला गेलेल्या कॉंग्रेसला तेजस्वी यादव यासारख्या युवा नेतृत्वाखाली निवडणूक लढावी लागली. या निवडणुकीत कॉंग्रेसचे कोठेच अस्तित्व दिसले नाही. कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे कामही तेजस्वी यादव यांच्यावर सोपवण्यात आले होते. विविध राज्यांतील पोटनिवडणुकीबाबतही कॉंग्रेसने अशीच कॅज्युअल भूमिका घेतली होती. मध्य प्रदेशसारख्या राज्यात प्रयत्न केले असते आणि निवडणुकीत चांगले यश मिळवले असते, तर शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला धोका निर्माण होऊ शकला असता, पण तसा कोणताही प्रयत्न कॉंग्रेसकडून झाला नाही.
गुजरात आणि उत्तर प्रदेश या भाजपाचा प्रभाव असलेला राज्यांमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपने जसे लक्षणीय यश मिळवले, तसे यश कॉंग्रेसला मिळवता आले नाही. आपल्या पक्षाचे काय चुकत आहे, याचे आत्मचिंतन कॉंग्रेस नेतृत्वाला आतापासूनच करावे लागेल. सतत कोणत्या ना कोणत्या प्रादेशिक पक्षासोबत मैत्री करून आणि त्या मैत्रीमध्ये दुय्यम भूमिका घेऊन कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढणार असेल, तर या पक्षाला पूर्वीची चांगली अवस्था कधीच प्राप्त होणार नाही. हा धडा आता कॉंग्रेस नेत्यांनी घ्यायला हवा. इतर राजकीय पक्षांनी जसे त्या त्या राज्यांमध्ये स्वतःचे स्वतंत्र आणि सक्षम नेतृत्व उभे केले आहे तसेच कॉंग्रेस पक्षाबाबत दिसत नाही. नेतृत्वाची ही दुसरी फळी निर्माण करण्याबाबतही कॉंग्रेस पक्षाला आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
बिहारच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे युवानेते तेजस्वी यादव यांनी जोरदार झंझावात निर्माण करून अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण त्या अपेक्षांमध्ये त्यांना कॉंग्रेसची पुरेशी साथ मिळाली नाही, हेही वास्तव नाकारून चालणार नाही. एवढे प्रयत्न करूनही राष्ट्रीय जनता दलाला सत्तेपासून दूरच राहावे लागेल, पण तेजस्वी यादव यांचे नेतृत्व मात्र सिद्ध झाले. बिहारमध्ये एक प्रभावशाली विरोधी पक्ष म्हणून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल कार्यरत राहील, असा संदेश निश्चितच या निवडणुकीने दिला आहे.
अतिशय योजनाबद्ध प्रचार करून तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीमध्ये नितीशकुमार यांच्या सत्तेला जवळजवळ सुरूंग लावला होता; पण थोडे प्रयत्न कमी पडले याची जाणीव आता तेजस्वी यादव यांनी करून घ्यायला हवी. काय चुकले ते समजून घेऊन पुढील निवडणुकीसाठी दुरुस्ती करण्याची सुरुवात आतापासूनच करायला हवी. एकेकाळी देशात उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमधील निवडणूक निकालांवर दिल्लीतील सत्ता ठरत असे. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपचा प्रभाव आहे आणि कॉंग्रेस निष्प्रभ होत चालली आहे. भारतीय राजकारणातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस आणि भाजप यांना या निवडणुकीमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रयत्नाप्रमाणे यश मिळाले असले, तरी या दोन्ही पक्षांना आत्मचिंतन करण्याचा संदेश निश्चितच या निवडणुकीने दिला आहे.