-विठ्ठल वळसेपाटील
सृष्टीतील पक्ष्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे व त्यांचे संरक्षण, संवर्धनासाठी जबाबदारी स्वीकारावी यासाठी जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली यांचा जन्मदिन 12 नोव्हेंबर तसेच वन्यजीव साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन 5 नोव्हेंबर याचे औचित्य साधून पक्षीप्रेमी व वन्यजीव मंडळाच्या मागणीनुसार राज्य शासनाने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा “राज्य पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा झाला.
पक्षी संवर्धनाबाबत डॉ. सालीम अली व महाराष्ट्रातील प्रसिद्ध वन्यजीव साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे फार मोठे योगदान आहे. 1924 सालापासून डॉ. सालीम अली यांनी भारतात पक्षी निरीक्षणास सुरुवात केली. पुढे त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. काही काळ इंग्लंडमध्ये काम केले. पुढे त्यांनी भारतात सुगरण पक्ष्याच्या वर्तनाचा अभ्यास केला. यामुळे त्यांची ख्याती जगभर पसरली. 1943 मध्ये लिहिलेले “द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात त्यांनी पक्ष्यांच्या सवयी, राहणी, जाती, उपजाती तसेच मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचे बदलते जीवन यावर शास्त्रीय लिखाण केले. भरतपूर येथील केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान व केरळमधील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाला हानिकारक अशा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला. “ताजमहाल नष्ट झाला, तर परत बांधता येईल, पण सायलंट व्हॅलीसारखे जंगल नष्ट झाले तर परत उभारता येणे अशक्य आहे’ असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले होते. अखेर पर्यावरणाचे महत्त्व जाणून इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. हे त्यांचे कार्य आजच्या पिढीसमोर ठेवणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर मारुती चितमपल्ली यांनी वनाधिकारी म्हणून 36 वर्षे नोकरी केली. या काळात आणि त्यानंतर एकूण 65 वर्षे जंगलात राहून वन्यजीवांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या “जंगलाचं देणं’ व “केशराचा पाऊस’ या पुस्तकांतून प्राणी, पक्षी आणि मानवी जीवन यांचे मनोभावे दर्शन घडते.
पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आज जंगलातील हिंस्त्र पशू मानवीवस्तीकडे झेपावत आहे. जंगलातील अन्नसाखळी नष्ट झाल्याने पशू, पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ससे, घोरपड, खोकड, माकड, खार, शेखरुखार, खवले मांजर, साळींदर, हरण, रानडुक्कर, मुंगूस असे जास्त उत्पत्ती होणारे प्राणीही झटपट नाहीसे होत आहेत. अन्नसाखळीतील प्राण्यांचे प्रमाण कमी होत असल्यामुळेच आणि या प्राण्यांवर जगणारे बिबटा, वाघ, लांडगा असे प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येऊ लागले. रस्ते विकासासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले.
जंगल, डोंगर, टेकडी, दरी भागांत 1972 च्या दुष्काळी परिस्थितीनंतर विदेशी झाडांची घुसखोरी झाली. पर्यावरण संवर्धनासाठी देशी पद्धतीची, आयुर्मान जास्त असलेली आणि खोलवर रुजणारी झाडे लावण्याबाबत जनजागृती झाली पाहिजे. बहुपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस, लाख, साल, कवठ या शिवाय साधी बाभूळ, हिवर, धावडा, आपटा, भोकर, पांगारा, पिपरी, नांदूक, मोह, पारिजातक, शिंदी, करंज, चंदन, कुसुम, बिबवा, खैर, हिंगण, गोधन, रानभेंडी, अर्जुन अशी भारतीय देशी झाडे महत्त्वाची आहेत. यामुळे पक्ष्यांना हक्काचे घर मिळते.
करवंदं, तरवड, मुरुडशेंग, निर्गुडी, अश्वगंधा, बोरकर, बोर ही झुडपे तर गुंज, शेवरी, कावळी, अनंतमूळ या वेली तर कुसळी गवत, एकदांडी, माकडशिंगी, पसरी गवत, गोधडी हे गवत केवळ खाद्य नव्हे तर चांगल्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात.
“मॉडर्न’च्या नादात विदेशी कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री अशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे. अंगणात तुळशी सोडली तर सारे सजावटीची विदेशी झाडे आहेत. यामुळे अंगणात फुलपाखरे व पक्षी बागडताना दिसत नाहीत. याशिवाय आधुनिक शेतीमुळे शेतात व शेतबांधावर तणनाशक वापरल्याने अनेक प्रकारची जैवविविधता नष्ट झाली. कीटकनाशकांमुळे या गवतावर जगणारे कीटक, फुलपाखरे नष्ट होतात. त्यामुळे या किटकांवर जगणाणाऱ्या पक्ष्यांचेही अस्तित्व धोक्यात आले.
पक्षी मूळ भारतीय असलेल्या रामकाटी बाभूळ यासारख्या देशी झाडावर घरटे बांधतात, पण विदेशी झाडावर घरटे बांधत नाहीत. पोपट, मैना, साळुंकी, सुतार पक्षी, धीवर, घुबड, घार, ससाणा, बगळे, माळढोक, पावश्या असे अनेक पक्षी हळूहळू नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. पोपटांचा थवा हा फक्त मुलांच्या गोष्टीतला व आठवणीतला विषय राहिला आहे.
काटेरी झुडुपे वन औषधी असत. त्यास रंगीबेरंगी फुले असत. या फुलांमधून मधमाशी मध गोळा करत असत. त्यामुळे डोंगर दऱ्यात हमखास मध, मोहळ दिसे. ते औषधी कामास उपयोगी असे. परदेशी झाडांना ना फुले ना फळे त्यामुळे मधमाशांचं अस्तित्व धोक्यात आले आहे. याशिवाय जंगलात सतत वणवे लागल्याने फुले येणारे तृण नाहीसे झाले त्यामुळे फुलपाखरेसुद्धा अदृश्य झाली आहेत. काटेरी झुडपे, गवत, पाणवठे, फुले, फळे देणारी झाडे यांची निवड करून त्यांची लागवड केली पाहिजे तर जंगलातील पक्षी हक्काने आपले घरटे विणू शकतील. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात चिमणी आणि इतर पक्ष्यांसाठी आपण वाटीभर पाणी व मूठभर धान्य ठेवतो त्याप्रमाणे पक्ष्यांच्या हक्काच्या घरट्यासाठी देशी व काटेरी वृक्ष लावावे. यामुळे समृद्ध वने उभी राहिली तर अन्नसाखळी टिकेल. यातूनच मानवाचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून पर्यावरणाची विविधता लक्षात घेऊन पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन ही आपली जबाबदारी आहे.