पटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर राजदशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यात आता राजदचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री सुधाकर सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी मी चोरांचा सरदार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सिंह यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
एका कार्यक्रमाला संबोधित करताना सुधाकर सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सुधाकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुधाकर सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ताकीद दिली. तसेच, सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करताना संयम ठेवण्याचा सल्ला दिला. तर, मी आपल्यावर वक्तव्यावर ठाम आहे, पाहिजे तर राजीनामा देऊ शकतो, असे सुधाकर सिंह यांनी सांगितले आहे.
दरम्यान, “कृषी विभागात प्रत्येक ठिकाणी चोर आहेत. या चोरांचा सरदार मी आहे. शेतकरी जेव्हा आमचे पुतळे जाळतील, तेव्हा समजेल ते संतापले आहेत. जर, त्यांनी असं केलं नाहीतर, वाटेलं राज्यात सर्वकाही ठिक आहे. येथे आम्ही एकटे चोरांचे सरदार नाही, आमच्यापेक्षाही वर काही चोर आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी बियाणे महामंडळ १०० ते १५० कोटी रुपयांची करतो,” असेही त्यांनी म्हटले होते.