कोलकाता: पश्चिम बंगालमधील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीने राज्यातील राजकारणच पूर्ण बदलून गेले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय युद्ध होताना दिसत आहे. त्यातच निवडणुकीच्या वेळी तृणमूल सोडून भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केला होता. त्याच नेत्यांनी आता पुन्हा एकदा घरवापसी करण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे भाजपला मोठा हादरा बसणार असल्याचे दिसत आहे.
सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीआधी कमळ हाती घेतले. सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता यांनी राज्याची सत्ता राखली. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.
तब्बल ३३ आमदार तृणमूलमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी तृणमूलचे ३३ आमदार भाजपमध्ये गेले होते. आता तितकेच आमदार पुन्हा तृणमूलमध्ये येऊ शकतात.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले मुकूल रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करू शकतात. कधी काळी ममता बॅनर्जींचे अतिशय निकटवर्तीय सहकारी राहिलेले रॉय निवडणूक निकालापासून शांत आहेत. त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉयने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे रॉयदेखील पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. तशी चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.