लखनौ – ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपला लक्ष्य करणारी उपरोधिक टिप्पणी केली. मतं विखरू नयेत यासाठी भारतरत्न जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
साधारणपणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र, यावेळी त्याआधीच बिहारचे दिवंगत नेते कर्पूरी ठाकूर यांना तो सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. तर, आडवाणी यांनाही त्या सन्मानाने गौरवले जाणार असल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. त्यावर अखिलेश यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
सन्मानासाठी भारतरत्न जाहीर करण्यात आलेला नाही. मतं बांधून ठेवण्यासाठी ती कृती करण्यात आली आहे, असे भाष्य त्यांनी केले. इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीतील उत्तरप्रदेशशी संबंधित जागावाटपाची चर्चा झाली आहे. त्याविषयीची सहमती जवळपास झाली आहे.
माझेही कॉंग्रेस नेतृत्वाशी बोलणे झाले आहे. जागावाटपाविषयी पेचाची कुठलीही स्थिती नाही, असा दावाही अखिलेश यांनी केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा उत्तरप्रदेशातूनही प्रवास करणार आहे. त्या यात्रेत सहभागी होणार का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले.