India vs England Test Series : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप होत असलेला स्टार फलंदाज शुभमन गिलला इशारा दिला आहे. शुभमन गिलच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास त्याला कसोटी संघातून वगळण्यात येणार हे निश्चित असल्याचे रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. चांगली सुरुवात करूनही शुभमन गिल मोठा डाव खेळण्यात अपयशी होत नसल्याने रवी शास्त्री निराश झाले आहेत. शास्त्रींनी शुभमनला बजावले आहे की, त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा संघात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
शुभमन गिल गेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळू शकला नाही. शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात करताना दिसला. मात्र गिल 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्यादरम्यान समालोचन करताना रवी शास्त्री म्हणाले की, शुभमन गिलसारख्या खेळाडूला संघात स्थान कायम करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे.
रवी शास्त्री यांनी युवा खेळाडूंना चेतेश्वर पुजाराची आठवण करून दिली आहे. माजी प्रशिक्षक म्हणाले, ”ही एक नवीन टीम आहे. बहुतांश खेळाडू तरुण आहेत. मात्र या युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की पुजारा पुन्हा संघात आपली जागा घेण्यास तयार आहे. पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये सतत धावा करत आहे.”
शुभमन गिलने गेल्या 11 कसोटी डावांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. गिल या 11 डावांत केवळ 18 च्या सरासरीने केवळ 207 धावा करू शकला आहे. विराट कोहली आणि केएल राहुलच्या पुनरागमनानंतर शुभमन गिलला संघातील स्थान वाचवणे खूप कठीण जाईल. एवढेच नाही तर सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे. सर्फराजला संधी देण्यासाठी संघ व्यवस्थापनावरही दबाव आहे. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा गेल्या वर्षीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपासून संघाबाहेर आहे.