कोलकाता – करोनामुळे सध्याचा कालखंड प्रचंड तणावाचा असला तरीही संयम सोडू नका. क्रीडा क्षेत्रात जसा प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत बॅडपॅच येतो तशीच परिस्थिती आज आली असे समजा. काळजी करू नका हा धोका देखील लवकरच संपेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रीडा जगताबरोबरच सर्व जगाला दिला आहे.
जगभरात करोनामुळे जवळपास 3 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक देशांत परिस्थिती आजही गंभीर दिसत असली तरीही त्यात बदल होईल. हा धोका संपुष्टात आल्यावर पुन्हा एकदा क्रीडा स्पर्धा सुरू होतील. मात्र, आज गरज आहे ती संयम ठेवण्याची. लॉकडाऊनमध्ये सर्वांनाच घरी थांबावे लागत आहे, त्यामुळे अनेकांची मानसिकता नकारात्मक बनलेली आहे, पण आपण याच काळात मानसिक उभारी दाखवली पाहिजे तरच सर्व परिस्थिती बदलेल, असेही गांगुली यांनी सांगितले.