Baramulla Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. मशिदीत नमाज पठणासाठी गेलेल्या एका निवृत्त पोलिसाची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळी झाडल्यानंतर संशयित दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. दहशतवाद्यांनी मशिदीवरही गोळीबार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या भ्याड कारवाया वाढत आहेत. पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर छुप्या पद्धतीने हल्ला केल्यानंतर त्यांनी आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
काश्मीर पोलिसांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. शिरी बारामुल्ला येथील गंटमुला येथील रहिवाशी मोहम्मद शफीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. निवृत्त एसएसपी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मशिदीत नमाज पठण करत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. गोळी लागल्याने ते जागेवरच ठार झाले. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. लोकांना या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
Jammu & Kashmir | Terrorists fired upon Mohd Shafi, a retired police officer at Gantmulla, Sheeri Baramulla, while praying Azan in the mosque and succumbed to injuries. The area has been cordoned off. Further details awaited: J&K Police pic.twitter.com/c2U1D6oHTl
— ANI (@ANI) December 24, 2023
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. गुरुवारी, दहशतवाद्यांनी केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यात घेराव बंदी आणि शोध मोहिमेच्या ठिकाणी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले, तर तीन जवान जखमी झाले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही जवानांची शस्त्रेही लुटण्यात आली आहेत.
तर दुसरीकडे, पुंछमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी आणलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लष्कराने ज्या तीन जणांना चौकशीसाठी बोलावले होते त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोशल मीडियावर काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये संशयितांवर अत्याचार होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. याप्रकरणी लष्कर आणि नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अफवा पसरवण्यापासून रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या बेशिस्त घटकांना रोखण्यासाठी हे करण्यात आले आहे. शांतता राखण्यासाठी जिल्ह्यांतील संवेदनशील भागात निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे.