उरुळी कांचन – राजकारणाच्या आखाड्यात सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी हरवले आहेत. त्यांचा विचार करून “बापू’ज डायरीमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने मांडली आहे. पुस्तक वाचल्यानंतर हे विचार हे पत्रकार बापू काळभोर यांचे आहेत की, मोठ्या बापूंचे आहेत, असा प्रश्न पडतो. “बापु’ज डायरी”तील बरेच विषय शालेय पाठ्यपुस्तकात येण्यासारखे आहेत, असे कौतुकोदगार दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी काढले.
थेऊर फाटा येथील हॉटेल एस फोरजीमध्ये प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) काळभोर यांनी लिहिलेल्या “बापू’ज डायरी” आठवणीतल्या चार गोष्टी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.१६) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्याधिकारी व वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पुणे शहर पोलीस दलातील अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, प्रिंट व डिजीटल मीडियाचे अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, तालुकाध्यक्ष संदीप बोडके, आरोग्यदूत युवराज काकडे, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वामी म्हणाले, “बातमीच्या पलीकडे काही विषय असतात. ते आपण वर्तमानपत्रात लिहू शकत नाही. असे विषय बापूंनी पुस्तकात हाताळले आहेत. कारण संवेदनशील विषयांवर सर्वसामान्यांना समजेल, अशा साध्या मराठीत पुस्तक लिहिणं ही साधी गोष्ट नाही. पुस्तकात वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत, ते अत्यावश्यक आहेत.”
भारतामध्ये पुणे शहर हे रहाण्यासाठी सर्वात सुंदर आहे, असे आपण वाचतो. देशात नंबर एक असले तरी विकासासाठी कुठेतरी आपण कमी पडल्याची खंत बापूंच्या मनात आहे. विद्येचे माहेर म्हणजे पुणे म्हणायला ठीक आहे. परंतु सत्य परिस्थिती काय आहे.
पुण्यात भरपूर इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. पैसे भरपूर घेतात पण तिथं शैक्षणिक गुणवत्ता मिळते का? हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे सर्व विषय योग्य पद्धतीने हाताळून यातून जागरूकतेचे काम केले आहे.
मंगेश चिवटे म्हणाले, “मराठी भाषा, संस्कृती कशी टिकू शकते, असा प्रश्न सध्या विचारला जातो. मराठी भाषा लिहिली, बोलली तरच टिकू शकते. मराठी भाषा संवर्धनाचे काम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात बापू काळभोर यांच्यासारखे लेखक करीत आहेत.
त्यांचा आदर्श समाजातील युवकांनी घेतला पाहिजे.” सुनील जगताप यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. अमोल अडागळे यांनी आभार मानले.
संवेदनशीलता व तळमळ
पाटील म्हणाले की, पत्रकारितेच्या पलीकडे सुद्धा दुसरे जग आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर बापूंनी अनेक विषयांवर लिहायला सुरुवात केली. त्यांनी सामाजिक विषयांवर चांगल्या पद्धतीने थोडक्यात छोटे, छोटे लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखणीतून त्यांची संवेदनशीलता व तळमळ दिसून येते. बाप्पुंनी केवळ समाजातील गंभीर विषय मांडले नाहीत. तर त्यावर उपायसुद्धा सांगितले आहे.