अमरावती : त्रिपुरातील अत्याचार आणि प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या घटनांच्या निषेधासाठी काल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान काही दुकानांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत तीन जण जखमी झाले. याच घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपाने बंदचे आवाहन केले. यानंतर आज पाळण्यात येत असलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे.
आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे. हे तरुण ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आक्रमक झाले आहेत.
अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. मात्र, असं असतानाही समोर आलेल्या दृष्यांनुसार आंदोलक बंद दुकानांची कुलुपं तोडून तोडफोड करत असल्याचेही दिसत आहे.
तसेच दुकानांबाहेरील साहित्याचेही नुकसान केले जात आहे. त्यामुळे आक्रमक आंदोलकांसमोर पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.