मुंबई महापालिकेने फटाके उडवण्यावर सोमवारी बंदी आदेश लागू केला, तिथे फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच एक दिवस फटाके उडवण्यास अनुमती देण्यात आली आहे. तिकडे दिल्लीत 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. राजस्थान सरकारने राज्यभर फटाकेबंदीचा आदेश या आधीच जारी केला आहे. अशीच राज्यस्तरीय बंदी महाराष्ट्रातही घालण्याची मागणी काही जणांनी आग्रहाने केली आहे, पण या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी लोकांशी संवाद साधताना घेतलेली भूमिका अधिक संयुक्तिक आहे.
त्यांनी म्हटले आहे की, फटाक्यांवर सरसकट बंदी आदेश लागू करून मी लोकांवर आणीबाणी लागू करू इच्छित नाही. लोकांनी स्वतःहूनच या विषयी मर्यादा पाळाव्यात. सध्या करोनाचा काळ आहे, त्यातून आपण अजून पूर्ण सावरलेलो नाही अशा स्थितीत पुन्हा ही स्थिती न बिघडवणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे लोकांनी फटाक्यांच्या प्रदूषणाची नवी आपत्ती आपणहून टाळली पाहिजे, असे कळकळीचे आणि प्रभावी आवाहन करून त्यांनी फटाक्यांवर सरसकट बंदीचा वरवंटा चालवणे टाळले आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा हा निर्णयच अधिक योग्य वाटतो. नाही म्हटले तरी अनेकांच्या दृष्टीने फटाके हा दिवाळीतला भावनिक मुद्दा आहे. आपल्याकडे संपूर्ण देशभर केवळ दिवाळीच्या सणालाच फटाके उडवले जातात. एरवीही त्याचा वापर होतो, पण तो मर्यादित असतो. फटाक्यांशिवाय दिवाळी ही कल्पना अजून भारतीय मनाला तितकीशी पटत नाही. किंबहुना दिवाळीची सारी मजाच फटाकेबंदीच्या निर्णयामुळे नाहिशी होत असल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळे फटाक्यांवर शासकीय पातळीवर बंदी घालण्याऐवजी प्रबोधन करून फटाक्यांच्या अनिर्बंध वापराला आळा घालण्याचे आवाहन करणे हाच या साऱ्या विषयावरचा चांगला मार्ग आहे असे म्हणावे लागेल.
फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते हे खरे आहे. त्यामुळे मोठे आवाज करणारे किंवा मोठा धूर करणारे फटाके वाजवू नका या विषयी नागरिकांना आवाहन करून त्यांचा निर्णय त्यांच्यावर सोपवून त्यांच्या पारंपरिक सण साजरा करण्याच्या पद्धतीला पूर्ण मोकळीक देणे हे महत्त्वाचे आहे. आता येथेच नागरिकांनी सारासार विचार करायला हवा. फटाक्यांचे समर्थन करणाऱ्यांनी अनेक कारणे दिली आहेत. केवळ फटाक्यांमुळेच प्रदूषण होते असे आहे का, एरवी ज्या बाबींनी वायू किंवा ध्वनी प्रदूषण होते त्याचे काय, असे आक्षेप त्यांनी उपस्थित करीत फटाकेबंदीला विरोध केला आहे. काहींनी फटाक्यांचे समर्थन करताना धर्माच्या राजकारणाचेही कारण पुढे केले आहे. वरवर पाहिले तर त्यांचे आक्षेप खरे वाटत असले तरी अंतिमत: यातून जे पर्यावरणीय नुकसान होते त्याकडेही डोळेझाक करता येत नाही. आज प्रदूषणाची पातळी रोखणे नागरिकांच्याच हाती आहे. दिल्लीत करोनाचा नवा कहर केवळ त्यामुळेच झाला आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे या साऱ्या प्रकारांवर काही प्रमाणात बंधने आवश्यक असली तरी त्याला कायद्याच्या बडग्याने बंदी घालण्याऐवजी लोकजागृती आणि प्रबोधनाचे तंत्र वापरणे अधिक गरजेचे आहे. लोक सांगूनही जेव्हा ऐकत नाहीत, तेव्हा कायद्याचा बडगा उचलणे आवश्यक ठरते हे जरी खरे असले तरी कायद्याने असा बंदी आदेश लागू करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करणेही योग्य ठरत नाही.
लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याला प्राधान्य देण्याची अत्यंतिक गरज आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांवर कायद्याने आणलेली बंदी लोक घाबरून पाळतीलही पण त्यांच्यात विशेषत: लहान मुलांमध्ये त्यामुळे जे हिरमुसलेपण येणार आहे त्याचाही विचार व्हायला हवा. दिवाळीतील बंदी संपल्यानंतर अन्य काळात संधीसाधून लोक दुप्पट प्रमाणात फटाक्यांचा वापर करीतच राहणार आहेत. त्यामुळे ठराविक काळापुरता त्यांना कायद्याचा बडगा दाखवून दाबून टाकण्यापेक्षा आपल्याच हितासाठी त्यांना अशा पर्यावरण घातक प्रकारांपासून दूर राहण्यास मानसिकदृष्ट्या तयार करण्याला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. फटाक्यांवर सरसकट बंदी घातली तर त्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण होतो, त्याच्या विक्री व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक उत्पन्नावरही विपरीत परिणाम होतो हेही वेगळे मुद्दे यानिमित्ताने उपस्थित होत असतातच. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्यांनी आरडाओरड सुरू करण्यास सुरुवातही केली आहे. तेथेही सरकारला वेळ आणि लक्ष द्यावे लागणार आहे आणि मार्ग काढावा लागेल.
दिल्लीसारख्या शहरात फटाक्यांवर पूर्ण बंदी असणे काळाची गरज आहे. कारण आधीच या शहराची हवा अत्यंत प्रदूषित झाली असून हवेतील धूर व धुलिकणाने तेथील लोकांना श्वास घेणेही अवघड बनले आहे. त्यात दिवाळीच्या फटाक्यांच्या धुराची भर पडली तर तेथे काय अवस्था निर्माण होईल याची कल्पना करवत नाही. त्यामुळे अशी अगदी हातघाईची स्थिती असलेल्या मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या आणि प्रदूषित शहरांपुरता फटाकेबंदीचा निर्णय लागू करणे एकवेळ रास्त ठरेल, पण देशाच्या अन्य विस्तीर्ण भागात वसलेल्या शहरांतील लोकांना कायद्याचा बडगा दाखवून त्यांना फटाक्यांपासून परावृत्त करण्याचे मात्र कारण नाही. कोणताही सण साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धती असतात. त्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या असतात. त्या पद्धती अशा एका रात्रीत तुम्ही बंद करू शकत नाही. त्यासाठी लोकांना मानसिक तयारी करण्यास पुरेसा वेळ दिला पाहिजे. दुष्परिणाम निर्माण करणाऱ्या पद्धतींविषयी जनजागृती करण्याचे काम करीतच लोकांमध्ये घडवलेला बदल हा कायमस्वरूपी आणि टिकाऊ ठरतो.