मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सोमवारी संगमनेर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत सत्यजीत तांबे हे देखील उपस्थित होते. यावेळी जाहीर सभेत थोरात यांनी चौफेर टोलेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. नाशिक पदवीधर निवडणूक, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी झालेला संघर्ष, राजीनामा नाट्य या सर्व विषयांवर थोरात यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“भारत जोडो यात्रा महाराष्ट्रा आली असताना सत्यजीतने त्यात खूप काम केले. सत्यजीतची टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू एकटा राहिला. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. माझा हात नीट असता तर तांत्रिक चूकही झाली नसती. मी स्वतः नाशिकमध्ये राहिलो असतो, ती चूक होऊ दिली नसती. परंतू या सगळ्यामधून माझ्या मताची दिल्लीने दखल घेतली आहे. काहीही झाले तरी पक्षांतर्गत गोष्टी आम्ही पक्षातच सोडवू.”, असे वक्तव्य थोरात यांनी जाहीर सभेत केले.
पुढे बोलताना त्यांनी,”डॉ. सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यांचा पदवीधर मतदारसंघ व्यवस्थित बांधला आणि सांभाळला. देशात कुठेही नसेल एवढा जनसंपर्क या पाच जिल्ह्यात तांबे यांचा आहे. मी नेहमी त्यांना म्हणतो की, मला तमुची गाडी आणि ड्रायव्हरचे कौतुक वाटते. सुधीर तांबे यांनी पाचही जिल्ह्यात जिव्हाळ्याचे नाते तयार केले, हे नाते सत्यजीत तू विसरू नको, असा सल्ला थोरात यांनी सत्यजीत तांबे यांना दिला. त्यांची मेहनत आणि कष्टामुळेच तुला मतदान झाले आहे. तुझे अपक्ष आता किती दिवस टिकते ते पाहू. कारण आमच्याशिवाय काही जमणार नाही आणि तुलाही करमणार नाही. डॉ. सुधीर तांबे यांचे काम आणखी पुढे कसे नेता येईल, अशी अपेक्षा मी सत्यजीतकडून करत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तसेच पुढे बोलताना, “संगमनेर तालुक्याच्या राजकारणात बंधूभावाची एक संस्कृती आहे. दहशतीची किंवा कुणाचं वाईट करुन त्याचे वाईट करण्याची आपली परंपरा नाही. संगमनेर तालुक्यात राजकारण करत असताना आपण कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केला, असं एकही उदाहरण तुम्हाला दिसणार नाही. आपल्याला आतापर्यंत भरभरून मतदान लोकांनी केले, पुढच्या काळात देखील लोक करतील.”, अशी भावना थोरात यांनी व्यक्त केली.