जालना : मराठा समाजा ला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात आमरण उपोषण सुरू केले. परंतु, या उपोषणाला शुक्रवारी वेगळं वळण लागलं. पोलिसांकडून झालेल्या लाठीमारामुळे मराठा समाजातील लोक आणखी पेटून उठले आहेत. दरम्यान, हे उपोषण मागे घ्यावं याकरता सरकारचा प्रस्ताव घेऊन खुद्द ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत नितेश राणेही उपस्थित होते. या दोघांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. परंतु, मी मेलो तरी चालेल पण पाच कोटी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू म्हणाले,’सरकारने अंत पाहू नये. अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. जालन्यातील जरांगे-पाटलांच्या उपोषणाला बच्चू कडू यांनी भेट दिली.
बच्चू कडू पुढे म्हणाले,’महाराष्ट्रातील मराठा कुणबी असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्यांच्या सरकारी दफ्तरी नोंदी कुणबी आहेत, त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरू करावे. यासाठी आम्ही सुद्धा आग्रही राहणार आहोत. पण, सरकारने अंत पाहू नये. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही.” असेही ते म्हणाले आहे.