Bachhu Kadu : बिहारमध्ये जात जनगणना झाल्यानंतर संपूर्ण देशात जातीवर आधारित जात जनगणना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच मागणीवरून आता प्रहार पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी सवाल उपस्थित केला आहे.
राज्यासह देशात पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातिगत जनगणनेला विरोध केला होता. त्यावर विरोधकांनीही संघ आणि भाजपवर चांगलीच टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी त्यावर भाष्य करतांना म्हटले की, जातिगत जनगणना व्हायलाच पाहिजे. त्याला आमचे (प्रहार पक्षाचे) समर्थन असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्याने कोणत्या समाजाचा लोकसंख्येत किती वाटा आहे, हे स्पष्ट होईल.” असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना, “मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जारांगे पाटील यांनी आता पुन्हा आंदोलन केल्यास मी कार्यकर्ता म्हणून त्यात सहभागी होईल. शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळून न्याय मिळायलाच हवा. विदर्भाच्या प्रश्नावर केवळ एक तास चर्चा होणे योग्य नाही. त्याने विदर्भाला न्याय मिळू शकत नसल्याचेही कडू म्हणाले.