मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी भाजपवाले पळून गेले होते असा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपांना आता भाजपकडून उत्तर देण्यात येत आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा उच्च भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. यावेळी “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी,”त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते,” असे चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले आहेत.
त्याच बरोबर “बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असे सांगितले होते असेही ते म्हणाले आहेत.