संगमनेर – प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत 18 ते 40 वयोगटातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार प्रतिमाह निवृत्त वेतन मिळावे म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंनी किसान मानधन योजना सुरू करण्यात आली.
या योजनेला संगमनेर तालुक्यात गावागावात प्रोत्साहन मिळत असून जनजागृतीसाठी प्रशासनाच्यावतीने विशेष शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. प्रधानमंत्री किसान मानधन योजना अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी असून योजनेचा लाभ शेतकऱ्यांना उतारवयात मिळणार असल्याने नाव नोंदणीसाठी गावागावात आपले सरकार केंद्रावर शेतकरी गर्दी करीत आहेत.
ही योजना ऐच्छिक व अंशदान असून या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला भारतीय जीवन विमाद्वारे निवृत्त वेतन दिले जाणार आहे. 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वय असलेले अल्पभुधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. त्यांना वयानुसार प्रतिमाह 55 ते 200 रुपयाची रक्कम जमा करावी लागणार आहे. सदर रक्कम ही नोंदणीनंतर लाभार्थाच्या खात्यातून ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्त वेतन मिळण्याची देखील तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच लगेच संबंधिताना प्रधानमंत्री किसान योजनेचे कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे. अल्पभूधारक सिंमात शेतकरी (पती-पत्नी) वेगवेगळ्या पध्दतीने यात सहभागी होऊ शकतात.
वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही प्रतिमाह 3 हजार रुपये वेगवेगळ्या स्वरुपात प्रदान करण्यात येतील. योजनेच्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील साकुर येथे बुधवारी (28 ऑगस्ट) तहसीलदार अमोल निकम यांनी याबाबत शिबिर घेऊन जनजागृती केली. यावेळी कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, कृषी अधिकारी प्रशांत शिंदे आदींसह शेतकरी, मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते. नोंदणी पूर्ण शेतकऱ्यांना तत्काळ प्रधानमंत्री किसान योजनेचे कार्ड देण्यात आले.