उरुळी कांचन – येथील महात्मा गांधी विद्यालयात अनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे शुल्क आकारले जात असल्याने शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात आल्याने यासंदर्भात पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या विद्यालयावर प्रशासक नियुक्ती करण्यासंदर्भातील आदेश संबंधीत शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. यातून ग्रामीण भागात बेकायदा शुल्क आकारणाऱ्या शाळांची यादीही तयार करण्याचेही आदेश असून यामुळे शिक्षणाचा धंदा करणाऱ्या शाळांचे धाबे दणाणले आहे.
महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 11वी ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 8 हजार पासून 13 हजार रुपयापर्यंत बेकायदेशीरपणे शुल्क घेतली जाते, त्यामुळे नागरिक व पालकांकडून याबाबत शाळा व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. परंतु, याची दखल घेतली जात नसल्याने अखेर पालकांच्यावतीने बबन कोतवाल यांनी याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच शिक्षण विभागाकडे तक्रार केली.
शिक्षण संचालक कार्यालय व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शुल्क आकारणीची चौकशी केली असता महात्मा गांधी विद्यालयात बेकायदेशीरपणे शुल्क आकारले जात असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क परत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने आता शाळेस दिले आहेत. मात्र, महात्मा गांधी विघालयाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही पालकांनी केला आहे.
याबाबत माहिती घेतली असता इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या 681 पैंकी 413 विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे पालक बबन कोतवाल यांनी सांगितले.
याबाबत जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्यांकडून खुलासा मागितला असता 681 पैंकी 413 विद्यार्थ्यांचे शुल्क परत केल्याचे सांगितले. परंतु, 268 विद्यार्थ्यांबाबत काहीही सांगितले नाही.
विद्यार्थ्यांकडून घेतलेले बेकायदा शुल्क परत करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यालयाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या कारभारामुळे तेथे प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करावी, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत प्रशासक नियुक्तीच्या कार्यवाहीला सुरूवात होणार आहे.
– मीनाक्षी राऊत, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक