खान पाहिजे की बाण पाहिजे, हा मुद्दा आता जुना झाला आहे. जातीचे राजकारण करून लोकांमध्ये विष पेरून युती आणि आघाडीच्या नेत्यांनी तालुक्याला अधोगतीकडे नेले आहे. लोकांना आता हे कळून चुकले असून, लोकांना मतदारसंघात विकास हवा आहे. जाती-पातीच्या राजकारणाने नव्हे तर विकासाने नेवासा मतदार संघ समृद्ध होईल त्यासाठी विकासात्मक दृष्टीकोन असलेले नेतृत्व हवे आहे.
व्यापर उद्योगाला चालना, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न आणि सिंचनासह मुळा, भंडारदरा व निळवंडे या धरणांतील हाक्काचे पाणी मिळवून शेती, उद्योग व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून मतदारसंघ विकासाच्या मार्गवर आणेन. तालुक्यातील बदलच विकास घडवेल, असे वंचित बहुजन विकास आघाडीचे युवा नेते संजय सुखदान यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.
विकास करण्यासाठी उद्योग, पर्यटन आणि व्यापार उद्योगाला चालना आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची नेवाशात काळाची गरज आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देऊन रोजगारनिर्मिती व त्यातून विकासाची गती वाढवण्याची आपल्याला मोठ्या संधी आहेत. ज्ञानेश्वर महाराज मंदिर, शनिशिंगणापूर व देवगड सारखी जागतिक दर्जाची धार्मिक पर्यटनस्थळे तालुक्यात आहेत. त्यामुळे तालुक्यात विमानतळ, रस्ते व इन्फ्रास्ट्रक्टर आदी सुविधा दिल्यास तालुक्यात विकासाची गती नक्कीच वाढणार आहे.
ग्रामीण भागातील विकासासाठी व शेतकरी सक्षम होण्यासाठी प्रथम भर देण्यात येईल. तसेच पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल मोठ्या शहरात पाठवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे माझे व्हीजन आहे. जातीय राजकारण सध्या चांगलेच पेटवले जात आहे. त्यामुळे खान पाहिजे की बाण, या एकाच मुद्यावर हे लोक राजकारण करत आले आहेत. हे कुठपर्यंत चालणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारांच्या हाताला काम उद्योग आणने माझे प्राधान्य राहील. नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हेल्प लाईन सुरू करण्यात येणार असल्याचा मानस सुखदान यांनी बोलून दाखवला. सध्या विरोधी पक्ष निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीपातीचे विष पेरून विकास होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी भविष्याचा विचार करून जातीचे राजकारण करणाऱ्यांच्या आहारी जाऊ नका, असे आवाहनही सुखदान यांनी केले.