मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे.
यामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त 8 तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी 13 तास लागत होते; आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ कमी होणार आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीस खुला केला करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादहून शिर्डी जाण्यासाठी वैजापूर व श्रीरामपूरमार्गे आदळ- आपट करीत चार तासांत शिर्डीत जाण्याच्या जाचातून भाविकांची सुटका होणार आहे.
औरंगाबादच्या सावंगी इंटरचेंजपासून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डी गाठणे शक्य होणार आहे. ज्यासाठी प्रवाशांना 170 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. तसेच नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी 900 रुपये आणि औरंगाबाद ते नागपूर या प्रवासासाठी 700 रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागणार आहे.