कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
राजगुरूनगर – तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा फायदा मिळाला पाहिजे, खेड कृषी विभागाचे काम समाधानकारक नाही, मला यात लक्ष घालावे लागेल, असा स्पष्ट इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिला.
खेड कृषी विभागाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या शेतकरी लाभार्थीना अनुदानित ट्रॅक्टर, विविध कृषी अवजारांचे वाटप आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती अंकुश राक्षे, अरुण चौधरी, सुरेश शिंदे, विनायक घुमटकर, सागर सातकर, कृषी अधिकारी नंदू वाणी, जयसिंग दरेकर, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले यांच्यासह लाभार्थी शेतकरी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मोहिते पाटील म्हणाले, शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ट्रॅक्टर खरेदी करताना त्यांना जादा किंमत मोजावी लागते. शासनाने दर निश्चिती केली आहे; मात्र त्यात अनेक त्रुटी असून त्या मंत्रालय पातळीवर सोडविण्यात येतील. कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात मन लावून काम करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
कृषी विभागातील कामे विविध योजनांचे लाभ त्यांना निसंकोचपणे मिळाले पाहिजेत; मात्र तालुक्यात तसे झाले नाही, आज मी विनंती करतो आहे, अन्यथा मला यात लक्ष घालावे लागेल असा स्पष्ट इशारा आमदार मोहिते यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला. शासकीय योजनांची माहिती शेतकऱयांना गावागावात दिली पाहिजे, कृषी सहाय्यक काम करीत नाहीत याबाबत लवकरच आढावा बैठक घेणार आहोत. सरकारचा उदात्त हेतू. चांगले धोरण आहे; मात्र शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. केंद्र, राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांना माहिती होत नाहीत.
या कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती न दिल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी गावागावात असलेल्या ग्रामपंचायती मध्ये विविध प्रकारचे अर्ज भरून घ्यावेत. कृषी विभागाने गावातील ग्रामसेवक सहाय्यक यांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून त्यांना योजनांची माहिती उपलब्ध करून द्यावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी केले सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी सोमनाथ गावडे यांनी केले तर आभार माजी पस सभापती अरुण चौधरी यांनी केले.
अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी उपस्थित नव्हते याचा कृषी अधिकाऱ्यांनी खुलासा करावा. कोणतीही तयारी न करता कार्यक्रम करणे चुकीचे आहे. लाभार्थ्याला काय फायदा होणार ते कृषी अधिकऱ्यानी शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे. पीक विमा, कृषी योजना यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे.