गोंदवले -दुष्काळी माण तालुक्यासाठी वरदान ठरणारी मुंबई- बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत म्हसवड येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. मात्र, काही राजकारण्यांनी स्वार्थापोटी ही एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा घाट घातला होता. मात्र, माणच्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचा हा डाव आपण कदापी यशस्वी होऊ देणार नाही. रामराजे नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पुतना मावशीचे प्रेम सर्व जिल्ह्याला माहित आहे. त्यांच्या स्वार्थापोटी सोयीच्या राजकीय तडजोडी सर्वांनी पाहिल्यात. या एमआयडीसीच्या नावाखाली तुम्ही अजूनही राजकीय तडजोडी करून स्वार्थ साधायला बसलाय. त्यामुळे दोघांनीही माणच्या एमआयडीसीबाबतची नौटंकी बंद करावी. माणची एमआयडीसी कुठेही जाणार नाही. ती इथेच होईल यासाठी माणची जनता अन आपण समर्थ असल्याचे शिवसेनेचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले.
शेखर गोरे म्हणाले, “”माणच्या एमआयडीसीवरून रामराजे व आ. गोरे यांची चाललेली शाब्दिक टोलेबाजी जिल्हा बॅंकेप्रमाणे सोयीची राहणार आहे. त्यांना जनतेचे काहीही देणे घेणे नाही. एकाला कायम खुर्ची हवी तर दुसऱ्याला दिव्याचे स्वप्न पडलेले आहे. दोघांचीही स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील. पण राजकीय फायद्यासाठी एकत्र येणाऱ्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये. तुमच्या स्वार्थासाठी माणच्या जनतेच्या स्वप्नाशी खेळाल तर याद राखा.”
कट्टर शत्रू असल्याचे दाखवत हेच दोघेजण जिल्हा बॅंक निवडणुकीत आपल्याविरोधात एकत्र लढले होते. ज्या पोळ तात्यांना जिंकून आणण्यासाठी मी प्रयत्न केले. त्याच पोळ तात्यांच्या मुलाला माझ्याविरोधात रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली उभे केले गेले. अन बॅंकेत पूर्ण पॅंनेल माघारी घेत आमदार गोरेंनी त्यांना साथ दिली. हे सर्व राज्याने पाहिलेय, या निवडणुकीत दोघेही एकत्र आले होते. तरीही नियतीने आपल्या बाजूने कौल दिला.’असे स्पष्ट करून ते म्हणाले, “आता हेच दोघे एमआयडीसीवरून एकमेकाविरोधात टीका करत जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे हे दोघेजण कधी एकत्र येतील अन एकमेकांना कधी विरोध करतील याची खात्री नाही. त्यांचे पुतनामावशीच प्रेम जनतेने ओळखले आहे.’
आम्हाला मोक्का लावला होता तरी आम्ही कोणाच्या पुढे झुकलो नाही. अन् कधी झुकणारही नाही. सोयीनुसार व वेळेनुसार राजकीय तडजोडी करणारी आमची औलाद नाही. ईडीच्या भीतीने काहींनी एमआयडीसीबाबतीत बघ्याची भूमिका घेतली होती. राजकीय पदे व सत्ता मिळवण्यासाठी हे दोघेजण काहीही करायला बसलेत. ते जनतेचा कळवळा दाखवून एमआयडीसीबाबत राजकीय तह करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. परंतु, त्यांच्या मनात असले काही असेल तर त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी माणची जनता व आपण खंबीर असल्याचेही त्यांनी सांगितले.