खर्डा -जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कुलमध्ये काही दिवसांपूर्वी शालेय पोषण आहार वाटपामध्ये तफावत आढळून आल्याने तालुका गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी पंचनामा करून शालेय पोषण आहाराचा साठा असलेल्या खोलीला स्थानिक स्कुल कमिटी, पंच, शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांच्या समक्ष सील केले होते. या गंभीर प्रकारात फक्त एका शिक्षकाची बदली करून हे प्रकरण अर्थपूर्ण तडजोडीतून मिटवून बाकीच्यांना क्लीनचिट दिल्याचा आरोप खर्डा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे व भास्कर गोपाळघरे यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खर्डा येथील शाळेत शालेय पोषण आहार वाटपामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी शालेय पोषण आहाराच्या घोटाळ्याची चौकशी केली असता त्यांच्या अहवालात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. याचा अहवाल रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ कार्यालय तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता.
अनेक विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात शाळेतील पाचवी ते आठवी या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बोगस सह्या करून पोषण आहार वाटप केल्याचे निदर्शनात आले होते. शालेय पोषण आहार वाटपात मोठी तफावत होती. आतिशय गंभीर प्रकार यामध्ये झाला असताना फक्त एका शिक्षकाची बदली करून हे प्रकरण अर्थपूर्ण तडजोडीतून मिटवून बाकीच्या शिक्षकांना यामध्ये क्लीनचिट देण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. एक महिना उलटूनही संबधितांवर कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नाही. फक्त संबधित शिक्षकास अवघे सात किलोमीटर अंतरावर बदली करून हे विषय दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे तक्रारदारांनी म्हटले आहे.
शाळेच्या सुट्टीच्या दिवशी तक्रारदार आणि संबंधित पंचनामा करतेवेळी जे पंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते त्यांना कल्पना न देता सील तोडून पोषण आहाराचे वाटत करतानाचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत जर कारवाई होऊन कायदेशीर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा खर्डा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, मदन गोलेकर, भास्कर गोपाळघरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष लष्करे, रामहरी गोपाळघरे, शशिकांत गुरसाळी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.