मुंबई – केंद्र सरकारच्या धोरणांचा जे लोक सक्षमपणे विरोध करत आहेत, त्या लोकांना टार्गेट करण्याचे काम मागील दोन-अडीच वर्षांपासून सुरु आहे. नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्यावर लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, हे तपशील पाहिल्यावर लक्षात येते, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
गुरूवारी (दि.24) महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या धरणे आंदोलनात जयंत पाटील सहभागी झाले. यावेळी ते बोलत होते.
नवाब मलिक अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे ते काम करत आहेत, त्यांच्यावर याआधी कोणताही गंभीर आरोप झालेला नाही. 20-25 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर बोट ठेवून ज्याचा संबंध नाही, अशा व्यक्तीला तुरुंगात टाकणे, या प्रकरणाचे कनेक्शन अतिरेकी संघटनांशी जोडणे हे योग्य नाही, असे ते म्हणाले. तसेच हा प्रकार भारतातील जनतेच्या लक्षात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आम्ही यावर अधिक भाष्य करणार नाही. पण याचा निषेध करणे तसेच केंद्र सरकारच्यावतीने विरोधकांना नामोहरम करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळातील सर्व सहकारी जमलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी महाराष्ट्रभर यासंबंधीच्या प्रतिक्रिया उमटणार आहेत. कोणत्याही अन्यायाला सक्षमपणे विरोध करणारा हा महाराष्ट्राचा माणूस आहे. मला खात्री आहे की, अशा जाचक कारवाईचा विरोध महाराष्ट्रातील जनता निश्चितच करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. कारण रोज उठून त्यांनी कुणावरही कारवाई केली तर त्याचा राजीनामा घेता येणार नाही. मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त लोकांना कशी अटक करायची हे त्यांचे स्वप्नच आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीला प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.