मंत्रिपदासाठी कोणीही नाराज नाही : शरद पवार
नगर – राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता इतर राज्यांतूनसुद्धा या पॅटर्नबाबत विचारणा केली जात आहे. आज थेट सांगता येणार नाही पण हा प्रयोग निश्चितपणे पुढे जाऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच मंत्रिपदासाठी कोणीही नाराज नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गुरुवारी नगर शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रमध्ये प्रयोग यशस्वी झाला. आता तो देशात होईल का, असे विचारल्यानंतर पवार म्हणाले, या संदर्भामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांच्याशीही संपर्क झालेला आहे. आगामी काळामध्ये या पॅटर्नबाबत निश्चितपणे विचार होऊ शकतो. कारण देशांमध्ये एक पक्ष पर्याय देऊ शकत नाही, त्यामुळे असा प्रयोग होण्यास काही हरकत नाही. लोकांनाही हे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत खातेवाटप निश्चितपणे जाहीर होईल, असे पवार यांनी सांगितले. खातेवाटपाबाबत कोणताही वाद नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. मी मंत्री असतानासुद्धा आम्ही शपथ घेतल्यानंतर एक-दोन दिवस खातेवाटप करण्यासाठी लागायचे व त्यानंतरच आपल्याला कुठले खाते मिळाले हे लक्षात येत असे. मंत्रिपदावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी व इतर पक्षांमध्ये नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर संख्याबळ सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातही कुणी नाराज नाही, उलट आमच्याकडे खाते नको म्हणणारेच आहेत. आम्ही गृहखातं द्या, असे म्हणालो त्या वेळेला ते माझ्याकडे नको असे सांगणारे सुद्धा आमच्याकडे आहेत, अशी कोपरखळी पवार यांनी यावेळी मारली.
म्हणून राहुरीला मंत्रिपद
नगर जिल्ह्याला मंत्रीपद देताना वेगळा विचार केला. अकोले, कोपरगाव, श्रीगोंदा, राहात्यालाही मंत्रीपद मिळाले होते. नगर शहरालाही सभापती मिळाले होते. राहुरी तालुक्यातच मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे मंत्रीपदासाठी राहुरीचा विचार करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.