प्रवीण ताटू
आतापर्यंत 3 कोटी 25 लाखांपर्यंत रक्तदान करणारी साईनाथ रक्तपेढी
शिर्डी – आंतरराष्ट्रीय खाती मिळालेल्या साईबाबांच्या शिर्डीनगरी आजवर अनेक विक्रमांची नोंद झाली. असाच एक विक्रम साईबाबा संस्थान आपल्या नावे करीत समाज सेवेत नवा ठसा उठविला आहे. साई मंदिराने राज्यात नव्हे तर देशात रक्तदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवून रक्तदान चळवळीच्या माध्यमातून एका वर्षात सुमारे 37 हजार रुग्णांना जीवनदान देण्याचे सामाजिक कार्य करून नवा विक्रम केला. आतापर्यंत तब्बल 3 कोटी 25 लाख जीवांना रक्तदान करणारी साईनाथ एकमेव रक्तपेढी ठरली आहे.
सन 2000 साली साईनाथ रक्तपेढी सुरू करण्यात आली. त्यावेळी रक्त संकलनाचा कार्य अवघड असताना विभागप्रमुख मैथिली पितांबरे यांनी या विभागाला संस्थानच्या माध्यमातून मूर्त स्वरूप देण्याचे महत्वपूर्ण कार्य आजतागायत सुरूच ठेवले आहे. या विभागाची निर्मिती झाल्यानंतर 2006 साली साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. त्यावेळी या रक्तपेढीचे कार्य खूपच वाढले. त्या रुग्णालयात डायलिसिस, बायपासच्या रुग्णाची विक्रमी वाढ झाली होती. त्यात या रक्तपेढीचे महत्वपूर्ण योगदान होते. त्या दरम्यान पेढीच्या माध्यमातून असंख्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. साई मंदिरात ही रक्त संकलन केंद्र उभारण्यात आले होते. त्यानंतर संस्थानचे 2016 साली सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली नवे विश्वस्त मंडळ आले.
हावरे यांनी तिरुपतीमध्ये केशदान तर शिर्डीत रक्तदान अशी योजना राबविली. या योजनेच्या माध्यमातून आध्यात्म सेवेबरोबरच समाज सेवेचा नवा पायंडा राबविला गेला. शिर्डीत रक्तदान करणाऱ्यास मोफत व्हीआयपी दर्शन, लाडू प्रसाद, उदी प्रसाद व रक्तदानाच प्रमाणपत्र देण्यात येते. या माध्यमातून 2017 साली रक्तसंकलनाचा उच्चांक गाठला. यामध्ये नगर, औरंगाबाद, नाशिक येथील काही रक्तपेढ्या व शासकीय रुग्णालयांनी रक्त संकलनही केले. त्यावर्षी सुमारे 10 हजार 973 युनिट संकलन झाले.
या सर्व बाबी संस्थांकडे रक्त घटक सुविधा असल्यामुळे शक्य झाले. ही जिल्ह्यात एकमेव उपलब्धी आहे. आज संस्थांनच्या रक्तपेढ्याकडे थॅलॅसिमिया, हिमोफेलिया, प्लेटलेट्स, लालपेशी, प्लाझ्मा, क्रायो हे रक्त घटक उपलब्ध करू शकले आहेत. ज्याचा आज शिर्डीच्या पंचक्रोशीला मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. जवळपास आठ रक्तपेढ्या ह्या संस्थानशी संलग्न आहेत. ही चळवळीस विकसनशील करण्यासाठी सुमारे 715 शिबिरे घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे सरते वर्ष 2019 मध्ये जवळपास साईनाथ रक्तपेढीने 29 हजार 164 युनिट संकलन केले आहे. आतापर्यंत सुमारे 3 कोटी 25 लाख जीवांना जीवनदान देण्याचे कार्य साई संस्थानच्या माध्यमातून करण्यात आल्याचे डॉ. विजय नरोडे यांनी दिली.