राजगुरूनगर – खेड तालुक्यात खरीप हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील 55 गावनिहाय धनादेश संबंधित तलाठ्यांकडे वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, अद्यापही 113 गावांतील 22 हजार 339 बाधित शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित असून 4 कोटी 62 लाख 5 हजार 374 रुपयांचा निधी येणे बाकी असून हा निधी त्वरीत वितरीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
खेड तालुक्यातील दुसऱ्या टप्यातील 3 कोटी 51 लाख 8 हजार 386 रुपयांचे 55 गावांतील 10 हजार 227 शेतकरी बांधवांसाठी धनादेश काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून संबंधितांच्या बॅंकखात्यावर निधी जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. प्राप्त झालेल्या निधीचे गावनिहाय धनादेश संबंधित तलाठ्याकडे वितरीत करण्यास सुरुवात झाली असून संबंधित बॅंकांकडे धनादेश तलाठी वितरीत करणार आहे.
अथवा तालुक्या बाहेरील बॅंक असेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नाव वैयक्तिक काढण्यात आलेला धनादेशन या शेतकऱ्याला गावात जाऊन दिला जाणार आहे. त्यामुळे तलाठ्यामार्फत बॅंकेकडे धनादेश जाण्यासाठी दोन-तीन दिवस लागणार आहे, तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यात तलाठ्यांकडे चौकशी करुनच मग बॅंकेत जाऊन नुकसानभरपाईची रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात 21 गावांतील 2823 शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख 98 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले होते. एकूण 189 गावांतील 44 हजार 416.13 हेक्टरपैकी नुकसान 12 हजार 163.72 हेक्टर क्षेत्रावरील 35 हजार 389 बाधित शेतकरी 9 कोटी 74 लाख 8 हजार 386 रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. पहिला दुसऱ्या टप्प्यात आलेली रक्कम वितरणाचे काम अंतिम टप्यात
आलेले आहे.
पहिल्या टप्प्यात समोर आलेल्या त्रुटी
जुलै-ऑगस्टमध्ये पीक पंचनामे 6 हजार 497 शेतकऱ्यांची नुकसानभरपाईचा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांचा निधी प्राप्त होताच वितरण करण्यात येईल. बाधित शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत बॅंक पासबुक, आधारकार्ड, झेरॉक्स कागदपत्रे जोडली आहेत; मात्र याद्या संगणिकृत तयार करताना एखादा बॅंक खाते नंबरमधील आकडा चुकल्यामुळे संबंधित खातेदाराच्या नावे निधी वितरीत केला नसल्याचे पहिल्या टप्प्यातील निधी वितरण झाल्यानंतर समोर आले आहे.