हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत भारताच्या संघाने विजयी सलामी दिली. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा तब्बल 55 विरुद्ध 18 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात भारत सातवेळचा विजेता आहे. त्यांनी या लढतीतही तसाच दर्जेदार खेळ केला.
बांगलादेशनेही काहीवेळा चांगल्या पकडी केल्या मात्र, त्यांना भारतावर दडपण राखता आले नाही. 2018 साली झालेल्या स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र, त्यांनी सुवर्णलक्ष्य केंद्रित केले आहे. त्यानूसारच खेळाडूंनी कामगिरी केली. पहिला हाफ संपला तेव्हाच भारताने 24-9 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
त्यावेळी बांगलादेशच्या खेळाडूंनी आक्रमक पकडी केल्या व दुसऱ्या हाफमध्ये भारताला कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेड गुणांत तसेच बोनस गुणांत दर्जा सिद्ध करताना भारतीय संघाने लोणचा धडाका लावला. अखेरच्या 20 मिनिटात भारताने तब्बल 12 गुणांची कमाई केली. नवीन कुमार गोयत व अर्जुन देशवालसह पवन सेहरावत यांनी अफलातून कामगिरी केली. भारताचा समावेश बांगलादेश, तैवान, थायलंड व जपानसह अ गटात आहे.
महिला संघाचा दक्षिण कोरियावर विजय…
पुरुष संघाप्रमाणे भारताचा महिला कबड्डी संघही विजयी आगेकूच करत आहे. मंगळवारी महिला संघाने दक्षिण कोरियाचा 56-23 असा सहज पराभव केला. यापूर्वी तैवानविरुद्धच्या लढतीत भारताला 34-34 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या सामन्यात मात्र, त्यांनी कोरियाला दडपणाखाली ठेवत वर्चस्व राखले.