मुंबई :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ज्या ढीसाळ पद्धतीने केले गेले त्यावर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी टीका केली आहे. श्रीलंकेत या काळात प्रचंड पाऊस असतो हे माहिती असतानाही या स्पर्धेतील सामने तेथे का खेळवले जात आहेत, हे मला पडलेले कोडे आहे, असेही गावसकर म्हणाले.
कोलंबोत मुसळधार पाऊस आहे मग तेथील सामने हंबानटोटाला का हलवले जात नाहीत. याबाबत खरेच सत्य काय आहे ते समोर यायला हवे. खेळाडूंना तेथे खेळायचे नव्हते का, आशिया समितीने कोलंबोत सामने आयोजित करण्यापूर्वी वातावरणाचा अभ्यास केला होता का, असेही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत, असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान,स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 असे समान गुण देण्यात आले होते. सामना रद्द झाल्यामुळे अनेक चाहतेही नाराज झाले होते.