#AsiaCup2023 Super-4 #INDvPAK : कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोरचा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला आणि सामना राखीव दिवसापर्यंत (Reserve Day) पुढे ढकलण्यात आला आहे.
कोलंबोमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अशा स्थितीत संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकण्यात आलं आहे.त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी पोहोचला आहे. आज सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे हा सामना आता सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पावसामुळे आज जिथे थांबला होता तिथूनच पुढे सामना सुरू होईल.
म्हणजेच सामना भारतीय डावाच्या 24.1 षटकांपासून सुरू होईल. सोमवारी 50-50 षटकांचााच सामनाा होईल. उद्याही पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.
आज सामना सुरू असताना काही तास पाऊस थांबला होता, मात्र मैदान ओले असल्याने ते सुकवण्यास मैदानातील कर्मचा-यांना वेळ लागला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही तासांनी पाऊस थांबला. मात्र, आऊटफील्ड ओले होते. रात्री 8.30 वाजता पंचांनी पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. रात्री नऊ वाजता खेळ सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, साडेनऊ वाजता पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला आणि पंचांनी सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने 24.1 षटकांत 2 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत. सध्या केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहेत. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 38 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली आहे.
त्याचवेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिलचीी आज तुफानीी खेळी पाहायला मिळाली. शुभमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली. त्याने कर्णधार रोहितला बाद केले.
दरम्यान, हिटमॅनने आपले 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्याचवेळी शुभमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुभमन 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला.