नगर –रस्त्याच्या कडेला असलेल्या खासगी जागेत पक्के बांधकाम न करता केवळ लोखंडी अँगलला रंगीबेरंगी लोखंडी पत्रे ठोकून दुकाने थाटण्यात येत आहे. उपनगरासह शहरात वाढत्या पत्रा गाळ्यांना आळा बसविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. मध्यतंरी सावेडी उपनगरात अशा पत्रांच्या गाळ्यांना आग लागल्यानंतर पत्रा मार्केटचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अशा गाळ्यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांना कर आकारणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता त्याचा आयुक्तांना विसर पडला आहे.
पत्रांच्या गाळ्यात झपाट्याने वाढ होत आहे. खासगी जागेसह महापालिका व शासकीय जागेत हे गाळे उभारले जात आहे. यासाठी कोणाची परवानगी न घेता सरळ टोलेजंग दुकान थाटण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. याबाबत आयुक्त खमकी भूमिका घेत नसल्याने काही महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावले आहे. गेल्या चार ते पाच वर्षात नगर शहरात सुमारे तीन ते साडेतीन हजार पत्राचे गाळे झाले आहेत. सावेडी, केडगाव, बोल्हेगाव या भागात कोणतीही नोंद न करता पत्र्यांचे गाळे उभारले जात आहे. बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी लागते. मात्र अशा पत्र्यांच्या गाळ्यांना न परवानगी ना नोंद अर्धा रात्रीतून गाळा तयार करण्यात येत आहे.
तीन वर्षापूर्वी महापालिकेने सर्व्हेक्षण केले असता सुमारे 1500 हजाराच्या वर पत्र्यांचे गाळे होते. त्यानंतर करोना काळात तर या पत्रा गाळ्याचा चांगलेच पेवच फुटले. सर्वाधिक खासगी जागेत अशा प्रकारचे गाळे मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आले आहेत. आता तो गाळ्याचा आकडा तीन ते साडेतीन हजारपर्यंत गेला आहे. मध्यतंरी गुलमोहर रस्त्यावरील प्राजक्त चौकात पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागली होती. जीवित हानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठे झाले होते. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी थेट आयुक्तांना लक्ष करून त्यांनाच या प्रकरणी दोषी ठरविले होते. आयुक्तांनी वेळीच पत्र्यांचे गाळे उभारण्यास आळा घालावा. नाही तर या गाळ्यांना कर आकारून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा पर्याय आ. जगताप यांनी सुचविला होता. त्यानंतर आयुक्तांनी देखील प्रभाग अधिकाऱ्यांना पत्र्यांच्या गाळ्यांची माहिती संकलित करून त्यांना कर आकारण्याचे तसेच कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन महिने झाले तरी अद्यापही कोणतीही कारवाई नाही की कर वसुली नाही. आयुक्तांना स्वतः दिलेल्या आदेशाचा आता विसर पडला आहे. त्यामुळे पत्र्यांचे गाळ्याचा दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.
अधिकाऱ्यांकडून उखळ पांढरे
पत्र्यांचे गाळे रात्रीतून उभारले जातात. याबाबत महापालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी संबंधिताकडे जाऊन जाब देखील विचारतात. गाळेधारकास अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महापालिकेच्या कारवाईचा धाक दखविण्यात येऊन आपले उखड पांढरे करण्यात येते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नालाच मुकावे लागत आहे.