नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पाठिंबा देण्याच्या निमित्ताने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांसाठी शरद पवार पंतप्रधानांना भेटतात मग नवाब मलिक यांच्यासाठी का नाही? असा सवाल ओवेसींनी विचारला आहे.
ओवेसी भिवंडीमधील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुघलांवरुन मुस्लिमांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही केला. ओवेसी यांनी यावेळी ज्ञानव्यापी तसेच ताजमहालच्या मुद्द्यांवरुन हल्लाबोल केला. तसेच मुस्लिमांची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. हलाल, हिजाब, अजाना सगळ्यांवर यांना आक्षेप आहे अशी टीका ओवेसींनी केली. ओवेसींनी महागाईच्या मुद्द्यावरुनही मोदी सरकारवर सडकून टीका केली.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी पंतप्रधान आणि सध्या देशाचे बादशाह होऊन बसलेले नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संजय राऊतांवर कारवाई करु नका सांगितले. त्यांना जेलमध्ये टाकू नका, असे सांगितले. पण त्यांना नवाब मलिकांची आठवण का झाली नाही ? हे मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना विचारायचं आहे”.
“नवाब मलिकांचं नाव का घेतलं नाही? देशाच्या पंतप्रधानांना भेटत असताना तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक यांच्याबद्दलही बोलायचं ना,” असे ओवेसी म्हणाले. “नवाब मलिक संजय राऊतांपेक्षा कमी आहेत का? मला शरद पवारांना विचारायचं आहे की, तुम्ही नवाब मलिकांसाठी का बोलला नाहीत? ते मुस्लिम आहेत म्हणून का? ते आणि संजय राऊत समान नाहीत का?,” अशी विचारणाही ओवेसींनी केली.