नगर – उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये परगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खासगी वाहतूकदारांनी (ट्रॅव्हल्स) प्रवासी भाड्यात दुप्पट वाढ केली आहे. सुट्यांमुळे रेल्वेस्थानक, एसटी बसस्थानक आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. रेल्वे स्थानकाच्या दररोज प्रवासी संख्येत मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल, मे महिन्यांत 1 हजारांनी वाढ झाली आहे.
तर एसटीच्या प्रवासी संख्येत मार्च महिन्याच्या तुलनेत 2 हजारांनी वाढ झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवासी फारसे वाढले नसले, तरी भाड्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. शाळा, कॉलेजांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक कुटुंबीयांसह पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर येथे फिरण्यासाठी जात आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी गावी परत जात आहेत. त्यामुळे रेल्वे, एसटी बसच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
एसटीची उलाढाल वाढली
एसटी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. बसस्थानक फुल झाले आहे. बसस्थानकातून मार्च महिन्यात दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत एप्रिल व मे महिन्यात वाढ आली आहे.त्यामुळे उलाढाल वाढली असून प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटी बसच्या फेऱ्या देखील वाढविण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली.
रेल्वेचे 10 टक्के प्रवासी वाढले
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मार्च महिन्यात रेल्वे स्टेशनवरून दररोज सरासरी 10 हजार प्रवासी प्रवास करत होते. एप्रिल आणि मे महिन्यांत सुट्या असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात दररोज 1 हजार प्रवासी वाढले उन्हामुळे वातानुकूलित (एसी) डब्यांची मागणी वाढली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.