नगर – उन्हाची तीव्रता वाढली असून, अंगाची लाही लाही होत असतांना महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नगरकरांना घर बसणे देखील अवघड झाले आहे. दररोज अर्धा ते तासभर वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नगरकरांना भर उन्हात बाहेर जात येत नाही आणि घरात बसले की घामाच्या धारा निघात आहे, अशी अवस्था झाली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे भर उन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची घरात घालमेल होत आहे. हा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे.
याबाबत महावितरणच्या कार्यालयांशी संपर्क साधून तक्रारही केल्या आहेत. मात्र, तांत्रिक बिघाड आहे, तो दुरुस्त झालेला आहे. आता वीजपुरवठा खंडित होणार नाही,’ अशी थातुरमातुर उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण केली जात आहे. मात्र, पुनःपुन्हा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अनेकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडे बोलही सुनावले आहे. तरी परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांमधून महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील वीज उपकरणे नादुरुस्त होत आहेत. याबाबतही अनेकांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. भारनियमनाबरोबरच ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रोहित्रं जळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.