विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा आरोप
पिंपरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये गतवर्षीपेक्षा साडे अकरा टक्के पाणीसाठा अधिक असून आजही धरण शंभर टक्के भरलेले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी टॅंकर लॉबीच्या फायद्यासाठी शहरावर पाणी कपात लादली आहे. ही कपात तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत काटे यांनी महापौर व आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर वासियांच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या पवना धरणात पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेर 100 टक्के इतका पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार हा पाणीसाठा जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा शिल्लक आहे. सध्या शहरामध्ये पाणी टंचाईचे कारण सांगून विभागावर आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. परंतु एक दिवस पाणी न आल्यामुळे पुढच्या दिवशीही त्या विभागात कमी दाबाने व विस्कळीत पाणी पुरवठा होतो, त्यामुळे नागरिकांना दोन दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागतो. ऐन पावसाळ्यामध्ये दापोडी, वाकड भागामध्ये अनियमित पाणी पुरवठा होत आहे.
नियोजन शून्य आणि बेजबाबदार कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कपातीचा मनमानी निर्णय सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याला प्रशासनाची दुर्देवी साथ मिळत आहे. शहरातील नागरिकांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. परंतु, सत्ताधारी व प्रशासन याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहे. मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिला भगिनींना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. तर लहान, मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. शहरातील टॅंकर लॉबीला फायदा व्हावा, म्हणून सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचा आरोपही काटे यांनी केला आहे.