– मे महिन्यात तालुक्यातील पाणी टंचाईचे संकट मोठे होण्याची शक्यता
वीसगाव खोरे – मे महिना सुरू झाला आणि भोर तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येऊ लागले असून या वर्षी टँकरची संख्या यंदा कधी नव्हे ती वाढली आहे. मे महिन्यात तालुक्यातील गावातून पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण होणार आहे.
भोर तालुक्यात दहा गावांना व त्यातील वाड्या वस्त्यांना ७ टँकरने पाणी पुरवठा सुरू असून तीन गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर तीन गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रस्तावित असल्याचे भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान, उन्हाची तीव्रता जास्त तसेच धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने धरणातील पाणीसाठा अल्प प्रमाणात राहिल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळेच यंदा एप्रिलमध्येच पाण्याचे संकट तालुक्यातील गावांवर आले असल्याने त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
उंबर्डे , शिळिंब, राजीवडी, वारवंड, पर्हर बु., नानावळे (शिंदेवस्ती) या पश्चिम भागातीत गावांना दररोज एक खेप तर हायवे लगतच्या गावामधील शिंदेवाडी दररोज ४, ससेवाडी दररोज २, करंदी खेबा दररोज ३, मोरवाडी (पाचलिंग) येथे दररोज एक खेप, अशा एकूण तालुक्यात दररोज सात टँकरच्या माध्यमातून १६ खेपातून १० गाव व त्यातील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वरोडी खुर्द, वरोडी डायमुख, जयतपाड हुंबेवस्ती या गावांचे टँकर प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून या ठिकाणी दोन दिवसात टँकर सुरू होणार आहे.
नीरा देवघर धरण क्षेत्रातील शिरवली हिमा, कुडली खुर्द, धानवली यांचे नुकतेच टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले.
सन २०२३ साली पर्हर, उंबर्डे, शिळिंब, वारवंड, शिरगाव या पाचच गावांना २ टँकरने पाणीपुरवठा केला होता. तुलनेत यंदा टँकरची संख्येत वाढ झाली असून यापुढील काळात टँकरची संख्या हमखास वाढणार असल्याने यंदा पाणी टंचाई संकटाला प्रशासनाला तोंड द्यावे लागनार आहे.
नीरा देवघर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणात पाणीसाठा १४ टक्के राहिला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणक्षेत्रातील विशेष करुन धरणाच्या पश्चिमेकडील टोकाच्या गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
“यावर्षी पाणी टंचाईचे प्रमाण वाढले असून टँकरसाठी ज्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले आहेत त्यांना तातडीने मंजूरी देण्यात आली आहे. नविन येणारे टँकरचे प्रस्तावही तातडीने मंजूरीसाठी तहसील विभागाकडे पाठविले जात आहेत.”
– किरणकुमार धनवाडे, (गटविकास अधिकारी पंचायत समिती भोर)
“शिरवली हिमा व कुडली खुर्द येथे पाणी टंचाई जाणवत असल्याने दोन्ही गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पंचायत समितीकडे सादर केले आहेत. मंजुरी मिळेपर्यंत ग्रामपंचायत मार्फत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.”
– नामदेव पोळ, सरपंच शिरवली हिमा,(ता.भोर)