लखनऊ : देशभर सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून वादंग सुरू असताना उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गेल्या आठ वर्षापासून राहणाऱ्या दोन बांगलादेशी हिंदुंना अटक करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या भागात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
वृंदावन पोलिस चौकीचे प्रमुख संजीव दुबे म्हणाले, हे घुसखोर वृंदावन भागात गेल्या आठ वर्षापासून रहात होते. त्यांच्याकडे बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने मिळवलेला पासपोर्ट सापडला आहे. मानव आणि केशव अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कसा पासपोर्ट मिळवला याची पोलिस चौकशी करत आहेत.
आपण 22 वर्षापुर्वी भारतात आलो आहोत. देशाच्या वेगवेगळ्या शहरात आम्ही यापुर्वी रहात होतो, असे या आरोपींनी सांगितले आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजकुमार नागरथ म्हणाले, नव्या नागरिकत्व कायद्यानंतर त्यांना अटक करणे चुकीचे आहे. त्यांना अटक करण्यापेक्षा त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी काय केले पाहीजे याचे समुपदेशन केले पाहीजे. उत्तर प्रदेशमध्ये आणखी काही बांगलादेशी असू शकतात. त्यातील बहुसंख्य हिंदू असावेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.