मुंबई: लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर एकत्र जमवणाऱ्या विनय दुबेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. नवी मुंबईतील ऐरोलीतून दुबेला मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. आपल्या मूळगावी परत जाण्यासाठी रेल्वेची मागणी करत हजारोच्या संख्येने मजूर काल वांद्य्रात जमले होते.
विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. त्याच्या आवाहनामुळेच काल बांद्य्रात गर्दी जमल्याचा आरोप आहे. दुबेसह 1 हजार अज्ञातांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचे नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
वांद्रे परिसरात काल दुपारनंतर जवळपास 4 हजार मजुरांचा जमाव जमल्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमाव आल्याने नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. या प्रकारानंतर वांद्रे रेल्वे स्थानक मुंबई महापालिकेने सॅनिटाइज केले आहे.
वांद्रे येथे हजारोंच्या संख्येने जमा झालेले कामगार मागील अनेक दिवसांपासून जवळच्याच वस्तीमध्ये राहतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे आपली प्रचंड गैरसोय आणि हालअपेष्टा होत असल्याची कैफियत या कामगारांनी मांडली. हे टाळण्यासाठीच आपल्या मूळगावी जाण्याचा हट्ट ते करत होते. त्यासाठीच ते वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या बस डेपो परिसरात जमा झाले होते.