जिस्ट्रर जनरल अँड सेनसस कमिशनर ऑफ इंडिया (आरजीआय) ने भारतीय आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र मांडले असून ते चिंताजनक आहे. हे चित्र करोना काळापूर्वीचे म्हणजे 2019-2020 चे आहे. यात म्हटले की, 82 लाख लोकांच्या मृत्यूंपैकी 45 टक्के म्हणजेच 37 लाख नागरिकांचा मृत्यू हा आरोग्य सुविधांच्या कमरतेमुळे झाला आहे. हा आकडा अन्य कोणत्याही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मानला जात आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेत देशात जवळपास दोन लाख जणांचा मृत्यू झाला. हा आकडा 37 लाखांतून वगळला तरी 35 लाख ही संख्या राहते. आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याने किंवा उपचाराची सोय नसल्याने 35 लाख लोकांचा मृत्यू होणे ही असाधारण बाब आहे. सध्या करोनाची लाट ओसरली असली तरी या आकड्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. करोनाच्या चौथ्या लाटेची किंवा अन्य संसर्गाची शक्यता असेल किंवा एखाद्या संसर्गाचा धोका असो किंवा नसो धोरणकर्त्यांवर देशातील आरोग्य व्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी आहे.
कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू हा उपचाराअभावी किंवा सुविधेअभावी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. ताजे आकडे पाहता दुर्दैवाने देशातील आजची स्थिती देखील आदर्श नाही. 2020 मधील असणारा आकडा हा सर्वाधिक आहे, पण एकुणातच दरवर्षी याच कारणांमुळे लाखो लोकांचे बळी गेले आहेत. गेल्यावर्षी तर मुंबई उच्च न्यायालयासमोर एक प्रकरण पोचले आणि त्यात महाराष्ट्रात उपचाराविना झालेल्या मृत्युबद्धल चिंता व्यक्त करण्यात आली.
अपुरा कर्मचारी वर्ग, दवाखान्यांची कमी संख्या, वैद्यकीय उपकरणांची टंचाई हे प्रमुख घटक आरोग्यसेवेची दुरवस्था सांगतात. म्हणून सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. आणखी एक कारण म्हणजे खासगी रुग्णालयातील उपचार हे अत्यंत महागडे आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्ती तेथे जाण्यास घाबरते. प्रत्येक खासगी कंपनी किंवा रुग्णालय हे व्यापारी दृष्टीने काम करत असल्याचे दिसून येतात. परंतु आरोग्य क्षेत्राकडे संपूर्णपणे व्यावासयिक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. ही बाब मानवतेच्या विरोधात आहे.
खासगी क्षेत्राने पैसा नक्कीच मिळवावा परंतु एका मर्यादेपर्यंत. दवाखान्यातील उपचार हे सामान्य रुग्णांच्या आवाक्यात ठेवायला हवेत. दुसरीकडे केंद्र सरकारने राज्यांशी समन्वय वाढवणे देखील गरजेचे आहे. विशेष म्हणजे करोना काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. परंतु त्याचे आकडे केंद्राकडील अहवालात नाहीत.
आश्चर्य म्हणजे गेल्यावर्षी ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी केंद्राला मिळवता आली नाही. म्हणून कोणत्याही स्थितीचा सामना करायचा असेल आणि त्यावर मात करायची असेल तर त्याचे चित्र स्पष्ट असायला हवे.
– शैलेश धारकर