विद्या मी ऑफिसला जाते गं. शाळेत सांगितलेला होमवर्क नीट पूर्ण करून ठेव आणि हे बघ, तू होमवर्क केला ना, तर मी येताना तुझ्यासाठी मोठ्ठी कॅडबरी घेऊन येईन. निघते मी आता.’
शेजारच्या घरातला हा संवाद थोड्याफार फरकाने मी बरेचदा ऐकतो. मनात सहज विचार आला, शाळेत नेमून दिलेला अभ्यास करणे हे वास्तविक पहाता प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीचे कर्तव्यच आहे आणि विद्यार्थी दशेत त्याने ते निमूटपणे पार पाडलेच पाहिजे. त्यासाठी मोठ्ठ्या कॅडबरीची लालूच हवीच कशाला. पण सध्याच्या वेगवान जगात सर्वच पालक आपल्या पाल्यासाठी वेळ देतातच असे नाही. मग कधी कॅडबरीचं, तर कधी नवीन खेळ आणण्याचं आमिष दाखवून अभ्यास करवून घेतल्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे आपण नको ते रोपटं लावून त्याला खत-पाणी घालतो आहोत हे पालकांच्या लक्षातच येत नाही.
संध्याकाळचा चहा घेऊन अंगणात बसलो होतो. समोरून खरे काका येताना दिसले. चेहरा जरा पडलेलाच दिसला.
“काय खरे काका, आज चेहरा असा पडलेला का?’ मी विचारले.
“काही नाही हो, श्लोकाला (त्यांच्या नातीला) घेऊन संस्कारवर्गाला सोडायला गेलो होतो. उशीर झाला होता. गडबडीत सिग्नल तोडला, तर हवालदाराने पकडले. पाचशेचा दंड करायला निघाला होता. म्हटलं बाबा शंभर घ्या आणि मिटवा. हो नाही करता अडीचशेवर मिटवले. अडीचशे वाचले, पण शेवटी अडीचशे गेल्याचे दुःख आहेच ना हो. आज-काल काय हो, जो तो पैशाच्या मागे लागलाय.’
मी काहीच बोललो नाही. हवालदार आणि खरे काका दोघेही एकाच माळेचे मणी, हे मात्र खरे. विचार केला, आपल्या मुलीने शाळेतला अभ्यास करावा म्हणून तिला आमिष दाखवणारे पालक आपल्याच हाताने विषवल्ली लावतात अन् जोपासतातसुद्धा.विद्यार्थ्याला अभ्यासासाठी दाखवलेली लालूच ही वेष्टनात गुंडाळलेली लाच आहे, असे मला वाटतं. एखाद्यानं त्याचे कर्तव्य पार पाडावे म्हणून त्याला लालूच दाखवणे कितपत योग्य आहे. कर्तव्य पार पाडण्यासाठी ठरविलेल्या मोबदल्याशिवाय दिला जाणारा, जास्तीचा मोबदला ही लाच आहे, असं माझं मत आहे.
कदाचित ही लाच पैशाच्या स्वरूपात नसून इतर स्वरूपातही असेल. रूप वेगळं असलं तरी तिला लाच असंच म्हणावं लागेल. ठराविक कंपनीच्याच गोळ्या-औषधे पेशंटला लिहून देऊन कंपनीच्या विक्रीला हातभार लावल्यामुळे एखाद्या डॉक्टरासाठी आयोजलेली परदेशी वारी हा लाचेचा असाच प्रकार. नातीला संस्कारवर्गासाठी घेऊन जाताना सिग्नल तोडल्यामुळे होणारा दंड वाचवताना हवालदाराला त्यात सामील करून घेणारे आजोबा, नातीवर काय संस्कार करणार! पण नाही अशीच काही मंडळी देशातील आणि परदेशातील भ्रष्टाचारावर बोलण्यात आघाडीवर असतात. भ्रष्टाचाराची पाळं-मूळं कशी खोलवर रुजलीत आणि तो निपटून काढणं कसं अशक्य आहे यावर यांची मतं म्हणजे अगदी दगडावरची रेघ समजतात आणि भ्रष्टाचाराच्या मोठ-मोठ्या प्रकरणावर हिरीरीने बोलत असतात.
आपल्यापैकी पुष्कळजण पेट्रोलपंपावर गाडीत हवा भरतात. काही ठिकाणी ही सेवा मोफत असते. पण काही दानशूर आपल्या दातृत्वाची इथे ओळख करून देतात. परिणामी हवा भरल्यानंतर पैसे न देणाऱ्या व्यक्तीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. काही स्टेशनवर पाणी देण्यासाठी एखाद्या पगारी व्यक्तीची नेमणूक केलेली असते, पण इथेही दयाळू आणि कनवाळू(!) लोक अशा व्यक्तीला पैसे देतात. एखादी वस्तू आणायला गेल्यावर पावती मागितली तर काही दुकानदार म्हणतात, “काय साहेब कशाला पावती घेता, उगाच जीएसटी भरायला लागेल. काही झाले तर मी आहेच की.
आपणही मग पावतीशिवाय वस्तू घेऊन दुकानदाराच्या कुकर्मात सामील होतो.वास्तविक पाहता बऱ्याच वस्तूंचे जीएसटी दर फार कमी आहेत, पण तोही वाचवायचा फंदात आपण विना पावती वस्तू घेतो. अशी वस्तू खराब झाल्यास दुकानदार आपला असतोच असे नाही. पावतीशिवाय वस्तू खरेदी केल्याने चरफडत बसण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नसतो. अशा प्रकारे जीएसटी टाळून देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाच्या महत्त्वाच्या स्रोतात आपणच अडसर बनतो. पण खडे मात्र इतरांच्या नावाने फोडतो. भ्रष्ट कृत्यात आपला थोडा का होईना सहभाग आहे हे त्यांच्या गावीही नसते. वर भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे असे म्हणायला रिकामे.
रोजच्या आयुष्यात अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत आपणच कळत-नकळत नको त्या गोष्टींना उत्तेजन देत असतो. काही लोक स्वतःच बी पेरतात, काही त्याचं संगोपन करतात आणि मग त्याचे रूपांतर जेव्हा वटवृक्षात होऊन त्याचं अक्राळ-विक्राळ स्वरूप दिसायला लागते आणि समोरची प्रत्येक गोष्ट आपल्या विळख्यात घेऊन गिळंकृत करायला वखवखते, तेव्हा आपण जागे होतो. लाच सर्व जग व्यापून उरली आहे त्याला कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपला सहभाग. लाच देताना आणि घेताना प्रत्येकाचा वकूब वेगळा असतो.
घेणाऱ्यांपैकी काही अल्पसंतुष्ट असतात तर काही असंतुष्ट असतात. काहींची भूक कधीच न भागणारी असते. लाच देणारे कधी नाईलाजाने तर कधी अनियमित कामे करून घ्यायची म्हणून ती देतात. लाच देणं आणि घेणं आपणच सर्वमान्य करून टाकलेलं असतं. लाच देणे आणि घेणे जरी गुन्हा असला तरी त्यासाठी केलेले कायदे, तिला रोखण्यास असमर्थ ठरलेले आहेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… पण सध्या आपण आपल्या छोट्या-छोट्या कृतीतून विषवल्लीना सोयरे बनविले आहे एवढं मात्र खरे.
तर मंडळी आपल्याला पटतंय का. आपणसुद्धा यापेक्षा वेगळी उदाहरणे अनुभवली असतील. अहो मी फक्त तुमच्या समोर सध्याची परिस्थिती मांडलीय. तेव्हा उशीर करू नका. केवळ चर्चा करीत, दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपणच आपल्याला शक्य असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टीतून आपला खारीचा वाटा उचलू आणि समोर उभ्या ठाकलेल्या विषवृक्षाचा बिमोड करण्यात सहभागी होऊ.
– विनायक ढवळे