– अरुण गोखले
मानवी जीवनात प्रतिवर्षी साजरे होणारे शारदीय नवरात्र हे त्याला खऱ्या अर्थाने जागे करण्यासाठीच येत असते. आश्विन शुुद्ध प्रतिपदा ते नवमी हे नऊ दिवस त्या देवीची उपासना करून, तिच्या नावाचा जागर करून, तिला भक्तीप्रेमाने हाक मारून तिच्या कृपा वरदानाची मागणी करून साजरे करायचे असते. या नवरात्र उपासनेची खरी सांगता आणि देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ होण्याचा दिवस म्हणजे “आश्विन पौर्णिमा’ अर्थातच ‘कोजागरी पौर्णिमा’.
या पौर्णिमेला “कोजागरी पार्णिमा’ असे म्हणतात कारण ती आदिशक्ती, आदिमाया तिची उपासना करणाऱ्या भक्तभाविकांना आपला कृपाप्रसाद देण्यासाठी त्या दिवशीच्या चंद्राच्या पिठूर चांदण्यातून भूलोकी अवतरित होत असते. आणि त्या वेळीही हेच पाहात आणि विचारीत येत असते की “को जाग रहा:’ म्हणजे “कोण जागा आहे?’ हे जागे असणे केवळ शरीराचे किंवा न झोपलेला म्हणजे जागा अशा संकुचित अर्थाचे जागणे नाही. तर ते आपल्या जीवनात सर्व प्रकारे कोण जागा आहे? कोण सतर्क आहे? कोण आपल्या कर्म कर्तव्याच्या बाबतीत आणि कसा दक्ष आहे? प्रत्येक जण जीवनातल्या प्रापंचिक कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पार पाडतो आहे. ते करताना त्याला आपली किती आठवण आहे? हे पाहात येत असते.
या सर्व बाबतीत नेमकेपणाने कोणता जीव हा जागा आहे. कोण आपली आठवण ठेवतो आहे? कोण आपल्याला मदतीला हाक मारतो आहे? कोण खऱ्या प्रेमाच्या, आत्म सुखाच्या भुकेने आपल्याकडे शरणागत भावानी येतो आहे, हे ती जगन्माता पाहात असते. ती आपल्यावर कृपा करते. आपल्या पाठीशी उभी राहते. आपला सांभाळ करते. जीवनातल्या कठीण प्रसंगांशी सामोरे जाण्याचे धैर्य आणि मनोबल शारीरिक आणि मानसिक पाठबळही देवीच आपल्याला देत असते. त्यासाठी आपण मात्र खऱ्या अर्थाने जागे व्हावे लागते. जो भक्त भाविक हा तिच्या सन्मुख उभा आहे. तिची आराधना, आठवण, पूजन करतो आहे. त्यालाच ती मायमाऊली आपल्या कृपेचा हात देते, त्यास भवसागरातून तारून वर काढते.