श्रीरामपूर -संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषण करण्याची वेळ आली. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश आहे. शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी आ. लहू कानडे यांनी केली आहे.
आ. कानडे म्हणाले की, सत्तांतरानंतर सन 2014मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मुस्लिम समाजाचे आरक्षण स्थगित ठेवून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे म्हणून विधेयक आणले आणि सर्वच पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला.
या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात देऊन आरक्षण हाणून पाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आंदोलने केली. जरांगे पाटलांच्या शांततामय आंदोलनाला शिंदे-फडणवीस सरकारच्या पोलिसांनी गालबोट लावल्यामुळे आंदोलन चिघळले आणि मुख्यमंत्र्यांना आंदोलनस्थळी येऊन महिन्याभरामध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन द्यावे लागले. परंतु मुदत संपून वर दहा दिवस झाले असतानाही आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला असल्याने जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे.
शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका असून, येणाऱ्या नागपूर अधिवेशनात आश्वासन पाळले न गेल्याने वैफल्यग्रस्त मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्याबाबत आम्ही या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सर्व आमदार राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आ. कानडे यांनी दिली.