मन ही काय गोष्ट आहे हे जवळपास अज्ञातच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र आपल्याला मन आहे हे प्रत्येकाला ज्ञात आहे. मनाचं शरीरात स्थान कुठे आहे, याबाबत माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. काही संस्कृतींमध्ये मन हे पोटात असलं पाहिजे अशी धारणा होती, तर प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत मन हे हृदयात स्थित आहे, असं मानलं जात होतं. पुढे ऍरिस्टॉटलनंही हीच कल्पना मन आणि आत्मा यांच्या बाबतीत उचलून धरली. याला हृदयकेंद्री व्यवस्था (कार्डिओसेंट्रिझम) असं म्हटलं जातं. गंमत म्हणजे अजूनही मन आणि आतडं यांचा संबंध असावा असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे!
श्री मद्भगवद्गीतेत मनाची एक प्रकारे व्याख्याच केली आहे-
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मन्ः।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु स्ः।। 3.42
याचा अर्थ शरीराचं स्थान इंद्रियांच्या वरचं आहे. त्याच्याही वरचं स्थान मनाचं आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा होय.
मनाचं स्थान मेंदूतील काही भागात असलं पाहिजे यावर बहुतेक शास्त्रज्ञांचं एकमत झालं आहे. अर्थात मन हे अमूर्त स्वरूपात असल्यानं मन हे मेंदूच्या अमुक एक ठिकाणी आहे, असं सांगता येत नाही. मेंदूतील सर्व केंद्रांतून येणारे संदेश, संकेत यांची गोळाबेरीज होऊन त्याबाबतची जिथे कृती किंवा पुढचा क्रम ठरवला जातो ती अमूर्त जागा म्हणजे मन असं ढोबळ मानानं म्हणता येईल. माझ्या दृष्टीनं मन म्हणजे विचारांचं आसन आहे. मनाची प्रक्रिया किंवा कार्य विचार करणं हे आहे. विचार आणि भाव यांचा मेळ घालूनच कृती केली जाते.
मानवाला मनाची मोठी देणगी आहे, असं म्हटलं जातं. परंतु मानवाच्या तुलनेत अप्रगत असलं तरी इतर प्राण्यांनाही मन असलं पाहिजे, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. तर्कबुद्धीचा वापर करून मानव खूप पुढचा विचार करू शकतो. ती क्षमता इतर प्राण्यांमध्ये नाही किंवा मर्यादित प्रमाणात आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तर्काची भक्कम बैठक नसली तरी ती उणीव इतर प्राणी नैसर्गिक प्रेरणेनं भरून काढतात असं दिसून आलं आहे. याचं कारण त्यांना जिवंत राहण्याची आणि पुनरुत्पत्तीची जबरदस्त प्रेरणा असल्यानं आणि त्यातच त्यांचा बहुतांश जीवनकाल खर्च होत असल्यानं तर्कबुद्धीची वाढ त्यांच्यात होऊ शकली नाही.
मनाचा वेग हा कालप्रवाहापेक्षा खूपच जास्त असतो. मनोजवं मारुततुल्य वेगं या हनुमानस्तोत्रातही मनाचा वेग खूप मोठा आहे असं म्हटलं आहे. आइन्स्टाइन तर आपल्या सापेक्षतावादाचं स्पष्टीकरण देताना म्हणतात की, एखादी प्रिय व्यक्ती आपल्यासोबत अर्धा तास असली तरी आपल्याला ती फार कमी वेळ आपल्यासोबत आहे असं वाटतं, कारण आपण मनानं त्या व्यक्तीसोबत खूप पुढं गेलेलो असतो- भविष्य रंगवीत असतो म्हणून सोबतीचा काळ खूप कमी भासतो. मनाला काबूत ठेवण्यासाठी “मन रे तू काहे न धीर धरे’ असं एका गीतात म्हटलं आहे ते याचमुळे.
मन हे खरोखरीच नियंत्रणात आणता येणं खूप अवघड आहे. केवळ योगी किंवा सिद्ध व्यक्ती हे करू शकत असावेत. मनात सतत वाईट विचार येत असतात. “मन चिंती ते वैरी न चिंती’ हे अगदी योग्य वर्णन आहे. एखादा अपघात पाहिला की आपल्यावर हे संकट आलं असतं तर किंवा येईल का, असा मनात विचार येतो. मनात वाईट विचार येणं हे स्वाभाविक आहे, पण त्यानुसार कृती करणं हे फार घातक आहे. म्हणूनच मनावर नियंत्रण आणणं अशक्य असलं तरी विचारांवर नियंत्रण आणणं हे अतिशय आवश्यक आहे.
नैराश्यामुळे एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या केली तरी तशाच परिस्थितीत आपल्या मनात प्रतिबिंबित झालेला विचार झटकून टाकला पाहिजे. मनाला सतत गुंतवून ठेवणं- तेही विधायक गोष्टींत किंवा विचारांत- हे नियमितपणे साध्य केलं पाहिजे. “ऑन एम्टी माइंड इज् डेव्हिल्स वर्कशॉप’ ही म्हण अगदी यथार्थ आहे. तसं घडलं तरच मन इष्ट दिशेला वळू शकतं.
– श्रीनिवास शारंगपाणी