शेजारचे जोशी आजोबा पेढे घेऊन आले. “काय आजोबा कसले पेढे आणलेत’, मी विचारले. “नातवाचे बारसं झालं. तुम्ही परगावी होता. आता आलात तेव्हा म्हटलं पेढे घेऊनच तुम्हाला भेटावं’, जोशी उत्तरले.
“नाव काय ठेवलत नातवाचे’, मी उत्सुकतेने विचारले.
“घटोत्कच’ नाव सांगताना ते थोडेसे अडखळले.
पेढा खाता-खाता सहज मनात विचार आला. प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे नाव ठेवायचा अधिकार आहे, पण ते ठेवताना, नाव उच्चारायला सहज सोपं असावं. एवढा विचार करायला काय हरकत आहे. बरेचदा ठेवले गेलेले नाव इतके मोठे असते की त्याचं लघुरूप दुसऱ्याच क्षणापासून सुरू होतं आणि खरं नाव फक्त कागदावरच राहतं. पूर्वीच्या काळी देवाधिकांची नावं सर्रास ठेवली जात.
जसे की राम, महादेव, शंकर, वामन इत्यादी. ही नावं ठेवण्यामागं दिवसातून बरेचदा त्या नावाच्या व्यक्तीला बोलावताना किंवा हाक मारताना देवाचं नाव आपोआप घेतलं जावं असा हेतू असावा, असं मला वाटतं. पण प्रत्यक्षात मूळ हेतूला फाटा देत देवाच्या नावाचासुद्धा लोक अपभ्रंश करतात. जसे की रामचे राम्या, महादेवाचे म्हाद्या, शंकरचे शंकऱ्या. अशा प्रकारे अपभ्रंश करून एखाद्या व्यक्तीला बोलावताना नकळतपणे देवाचा अनादर होतो, याची पुसटशी जाणीवही हाक मारणाऱ्या व्यक्तीला होत नाही.
आणखी एक गृहस्थ आहेत. त्यांना मुलगी झाली. मी त्यांना विचारले की, मुलीचे नाव काय ठेवले. तर म्हणाले “शिरीष’. ते गृहस्थ पेढे देऊन निघून गेले आणि तेवढ्यात बायको आली, तिला सांगितले की त्यांना मुलगी झाली त्याचे पेढे दिलेत.
“काय नाव ठेवलं मुलीचं’, बायकोने विचारले आणि नाव ऐकताच “शिरीष तर मुलाचं नाव असतं ना?’ तिनं सहज विचारलं. “असं काही नाही, हे नाव उभयलिंगी आहे. शिरीष पै या सुप्रसिद्ध लेखिका होत्या. काही नावं मुलगा वा मुलगी दोघांचीही असू शकतात. आता मृणाल हे नावसुद्धा उभयलिंगी आहे. मृणाल म्हणजे कमळाचा व्यवस्थितपणे रचलेला ढीग. हा शब्द संस्कृत भाषेपासून आलेला आहे.’
मी सामान्य ज्ञान दाखवायची संधी सोडली नाही. आता आपल्या प्रिय जणांचे नाव काय ठेवायचे हा ज्याचा त्याच्या आवडीचा प्रश्न आहे, हा भाग वेगळा.
तुम्ही बाजारात येऊ घातलेल्या एखाद्या नवीन वास्तूचे नाव सुचवा किंवा नवीन हॉटेलचे नाव सुचवा आणि बक्षीस जिंका, अशी जाहिरात पाहिली असेल. त्याचप्रमाणे नवजात बालक किंवा बालिका यांच्यासाठी नाव सुचवा अशी जाहिरात देणारेही आहेत. नवागताचं नाव त्याच्या नातेवाइकांनी पुष्कळदा त्याच्या जन्माच्या अगोदरच नक्की केलेले असते. एवढेच नव्हे तर त्यांचं काम सोपं व्हावं म्हणून बाजारात अशी नावं सुचविणारी पुस्तकेही उपलब्ध आहेत. नामकरणाच्या वेळी काही वेळा एका पेक्षा जास्त नावे ठेवली जातात. जवळचे आणि हौशी नातेवाईक जेवढे जास्त तेवढी नावांची संख्या जास्त. त्यामुळे बाळाच्या आत्याची पाठ मात्र प्रत्येक नावाचे धपाटे खाऊन चांगलीच रगडून निघते. आता हे ठेवलेले नाव आणि ती व्यक्ती याचा परस्परांशी काही संबंध असतो का? असा विचार केल्यास, बरेचदा असे आढळते की असा काहीच संबंध नसतो. नामकरणानंतर व्यक्तीला चिकटलेले नाव शेवटपर्यंत त्याला साथ देते. अपवाद फक्त त्याने काही कारणास्तव आपले नाव बदलून घेतले तरच.
एखादा चित्रपट तिकीट खिडकीवर तुफान चालल्यावर त्यातल्या हिरोचं नाव बरेचजण आपल्या मुलासाठी निवडतात. पुढे जाऊन काहीवेळा हिरोचं नाव ठेवलेला मुलगा आयुष्यात झिरो ठरतो हा भाग वेगळा. सचिन तेंडुलकर फॉर्मात असताना त्याच्या नावाची अशी काही किमया घडली की पुष्कळ लोकांनी आपल्या मुलाचं नाव सचिन ठेवलं. नंतरच्या काळात यातला एकसुद्धा मुलगा सचिनच्या पराक्रमाच्या जवळपासही पोहोचू शकला नाही, हा भाग वेगळा. शेक्सपिअरने असे म्हटले आहे की, नावात काय आहे. पण मंडळी नावातच सर्व काही आहे. नाहीतर भीम नाव घेतल्यानंतर समोर पाप्याचं पितर पुढे उभं राहिलं किंवा शीतल नावाची मुलगी शीघ्रकोपी असली तर आपल्याला काय वाटेल. नावाचा महिमा अगाध आहे. काळानुसार काही नावं प्रकाशात येतात तर काही नावं बदनाम होतात. आपल्या आवडत्या नेत्याचं नाव आपल्या मुलासाठी निवडून काहीजण त्या नेत्याविषयीच आपलं प्रेम व्यक्त करतात. काही नावं ठरावीक काळात चमकतात तर काही नावं बदनाम होतात. आता प्रत्यक्षात असे नाव आणि त्या व्यक्तीचे कर्तृत्व किंवा दुष्कृत्य याचा काहीही संबंध नसतो. परंतु ठेवलेले नाव लगेच बदलता येत नसल्याने अशा नावाच्या व्यक्तीला मान वा अपमानास सामोरे जावे लागते.
काही नावं सदाबहार आणि लोकप्रिय असतात, तर काही नावं एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीमुळे लोकप्रिय होतात. काही नाव कायम चर्चेत असतात तर काही अलिप्त असतात. काही व्यक्ती नावाप्रमाणेच असतात, तर काही नावाच्या अगदी विरुद्ध असतात. काही व्यक्ती नामधारी असतात. त्यांच्या नावाचा अन् कामाचा परस्पर कसलाच संबंध नसतो. काही नावं वलयांकित असतात तर काही कलंकित असतात. काहींच्या कर्तृत्वात नसला तरी नावात दबदबा असतो. काही नावात बराच अर्थ दडलेला असतो; पण गंमत म्हणजे त्या व्यक्तीला तो अजिबात ठाऊक नसतो. प्रत्येक व्यक्तीला आपले नाव प्रिय असतेच. नाव प्रेमानं ठेवलेलं असतं. पाळण्यातील नाव, टोपण-नाव, नावरस नाव, घरातलं नाव, शाळेच्या रेकॉर्डवरचे नाव आणि मित्रमंडळींच्या कंपूतले नाव आणि बायकोने लाडाने ठेवलेले नाव. अशी एका व्यक्तीची बरीच नावं असतात. असं जरी असलं तरी मंडळी, नाव कसं असावं असं जर मला विचारलं तर मी सांगेन, नाव छोटं आणि उच्चारायला सहज सुलभ असावं. एवढं सांगून थांबतो, नाहीतर या नाम पुराणावरून लोक मला नावं ठेवायला लागतील.
– विनायक दिनकर ढवळे