एखादे बी आपण जमिनीत पेरले तर काही दिवसांनी अंकुर फुटतो, नंतर रोपटे तयार होते, पुढे हेच रोपटे मोठा वृक्ष बनते. नेमके अशाच प्रकारे आपल्या मनात आत्मविश्वासाचे बीज कसे पेरायचे आणि आत्मविश्वासाच्या मोठ्या वृक्षात कसे रूपांतर करावयाचे याविषयी थोडेसे…
आपल्याला आयुष्यात आत्मविश्वास हा आवश्यकच असतो. पण तो काही एकाएकी मिळत नाही. आपण ज्या क्षेत्रात आहोत ते सतत काम करून, अनुभव घेऊन त्या क्षेत्रात आपल्याला आत्मविश्वास निर्माण होत असतो. जीवनात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांतूनही आपणाला बरेच काही शिकायला मिळते.
प्रत्येक अनुभव आपणच घेतला पाहिजे हे आवश्यक नाही. येथे एक लक्षात घ्यायला हवे की, आपण प्रत्येक प्रयोग स्वतःवर करून पहावयाचा नाही. आपल्याला जर काही करण्याचा विचार असेल तर, तो विचार आपल्याआधी कोणीतरी केलेला असतो आणि त्यावर कार्यवाही पण केलेली असते. आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत त्या परिस्थितीतून जाणारे आपण काही पहिले नाही. आपल्या आधी कोणीतरी अशाच परिस्थितीतून गेलेले असतेच.
थोडक्यात, आपण काही करण्यापूर्वी इतरांनी काय केले आहे याची माहिती घ्यावी, निरीक्षण करावे. त्यांनी काय उपाययोजना राबविली, समस्यांतून कसा मार्ग काढला याची माहिती घ्यावी. त्याबरोबरच त्यांनी केलेल्या चुका आपण टाळाव्यात म्हणजे आपले यशस्वी होण्याची शक्यता वाढते. एका कामात अपेक्षित यश मिळाले की आपल्याला दुसरे कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वासही निर्माण होत असतो.
आत्मविश्वास ही काही एकच अशी वस्तू नाही की जी बाजारातून विकत आणली. आत्मविश्वास हा अनेक अनुकूल घटक एकत्र आल्यानंतर आपल्याला मिळत असतो. दुसऱ्या शब्दांत आपल्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे. माहिती असणे आवश्यक आहे. अनुभव असणे आवश्यक आहे. हे व याहून अधिक घटक एकत्रित येऊन यातूनच आत्मविश्वास विकसित होत जाणार आहे. आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधी स्वतःच्या क्षमतेवर, कौशल्यावर पूर्णपणे विश्वास असावयाला हवा. पहिल्यांदाच काही धाडस करताना एकदम मोठे धाडस न करता छोटेच धाडस करावे.
पुढे हळूहळू मोठे धाडस करावे. काम सुरू करताना आधी सोपे काम आधी करून टाकावे नंतर मुश्किल कामाकडे वळावे. कामाचे अचूक नियोजन करावे. म्हणजे कामाचा बोजवारा उडणार नाही. नियोजन जर केले तर येणाऱ्या संभाव्य अडचणींचा अंदाज आधीच येतो, त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपणही काही पूर्व तयारी करू शकतो. प्रत्यक्ष अडचणींना सामोरे जाताना आपल्यात आपोआपच आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. कारण आपण गृहपाठ आधीच केलेला असतो.
आपण करत असलेले काम सद्हेतूने करीत असू, तसेच आपली बाजू जर सत्याची असेल तर आपल्यात आत्मविश्वास आपोआपच येतो. आत्मविश्वास मिळविण्यासाठी चौकस असणे आवश्यक असते. नाहीतर सगळीकडे दुर्लक्ष केले तर आपला विकास होत नाही. चार लोकांचे विचार ऐकण्याची, समजून घेण्याची वृत्ती असली पाहिजे, यामुळे आपली वैचारिक उंची वाढते. ज्या बाजूवर आपण विचार केलेला नसतो अशा बाजूवर दुसऱ्याने विचार केलेला असतो. त्यामुळे आपल्यालाही विचार करण्याची दिशाही मिळते. आपल्याला इतरांचे विचार आयतेच मिळाल्यामुळे आपण त्यापुढे जाऊन विचार करू शकतो.
बऱ्याच वेळा आपल्या समोर कसलेली, मुरब्बी, निष्णात व्यक्ती असते. आपल्यापेक्षा सगळ्याच बाबतीत सरस असते. त्या व्यक्तीच्या तुलनेत आपण जरी कमी असलो तरी आपलेही काही अस्तित्व आहे हे आपण विसरून चालणार नाही. खेळामध्ये बऱ्याच वेळा नवोदित खेळाडूने दिग्गज खेळाडूला पराभूत केल्याची बरीच उदाहरणे आहेत. व्यावसायिक दृष्ट्याही असा फरक असतोच. चहा आपल्याला हातगाडीवरही मिळतो आणि तारांकित व नामांकित उपहागृहांमध्येही मिळतो. रस्त्यावर चहा अल्प दरात मिळतो तर तारांकित हॉटेलमध्ये तुलनेने जास्त दरात मिळतो. मिळणाऱ्या सोयीसुविधांचाही फरक असतो. दोन्हीकडे व्यवसाय होतच असतो.
ग्राहक दोन्हीकडेही आहे. म्हणून आपण आपली तुलना कोणाशीही करावयाची नाही. ज्याचे त्याचे ज्याच्या त्याच्यापाशी. आपली भूमिका आपणच उत्कृष्ट तऱ्हेने निभावू शकतो दुसरा कोणी नाही. आपण काही काम सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे आत्मविश्वास हवाच. आपण मनाशी एक पक्की खुणगाठ बांधून ठेवली पाहिजे की “दुसरे कोणी मोठे असल्याने आपण लहान होत नाही. तो त्याच्या जागी आपण आपल्या जागी.’ सुरुवातीला आपल्याकडे साधनसुविधा कमी असल्या तरी आत्मविश्वासाने सुरुवात करणे महत्त्वाचे. अनेक छोट्या व्यवसायाची सुरुवात ही शून्यातूनच झालेली दिसते. ऍपल, गूगल, एच.पी. ऍमेझॉन, डिस्ने, मायक्रोसॉफ्ट, हार्ले डेव्हिडसन ही व इतरही काही आस्थापने सुरुवातीला एका छोट्याशा जागेतच सुरू झाले.
आपण दुसऱ्याला मदत करण्याचा दृष्टीकोन ठेवायला हवा. दुसरा कोणी निराश झाला असेल, तर त्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आपण आपल्या कामाबरोबर त्यालाही त्याच्या कामात मदत करू शकतो. आपल्या अशा काही कृतीनेही आपल्या स्वतःला काही समाधान मिळते, त्यामुळेही आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या आयुष्यात नकारात्मक परिस्थिती बऱ्याचदा निर्माण होणारच, अशाच परिस्थितीत आपली खरी कसोटी लागते. आपण खचायचे नाही. आपण स्वतःलाच एक असे वचन द्यावयाचे की, “मी शेवट्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न करीतच राहीन.’ शेवटच्या क्षणीसुद्धा बाजी पटलू शकते.
आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून “निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी मजला कितीही अडचणी आल्या तरी मी मागे हटणार नाही. ध्येय गाठण्यासाठी मजला जे काही करावे लागले ते मी केल्याशिवाय रहाणार नाही’ अशा निश्चियाचे पुष्प आपण जेव्हा आपल्या मनो देवतेला अर्पण करू तेव्हा आपल्यात आत्मविश्वास संचारल्याचे जाणवेल यात शंकाच नाही.
– अनिकेत भालेराव