बेंगळुरू :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या कृती आराखड्यावर रणनीती आखण्यासाठीच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी 2 ऑगस्ट रोजी राज्यातील मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नवी दिल्ली येथे बैठक बोलावली आहे, असे स्पष्टीकरण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेस आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावून पक्षश्रेष्ठींनी कर्नाटकातील स्थितीत हस्तक्षेप करण्याचे योजले आहे, असा प्रचार केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
शिवकुमार म्हणाले की, त्या बैठकीत आमचा राजकीय अजेंडा आहे, आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी कृती आराखडा अंतिम करायचा आहे. आम्हाला संसद निवडणुकीसाठी सर्व नेत्यांची जबाबदारी निश्चित करायची आहे आणि तिकीट वाटप प्रक्रिया ठरवायची आहे. त्यासाठीच ही बैठक आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.
उमेदवाराची निवड कशी करायची, कोणताही मंत्री किंवा आमदारला मैदानात उतरायचे तर त्याबाबत काय धोरण घ्यायचे त्याचेही निकष निश्चित करायचे आहेत म्हणून हायकमांडने सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलावले आहे.
एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह अन्य नेते दिल्लीच्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
पक्षांतर्गत कोणतीही नाराजी नाही. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवावी अशी आमदारांची मागणी होती. त्यानुसार ही बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री सर्वांशीच बोलून यावर तोडगा काढीत आहेत. त्यामुळे तो विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.