नवी दिल्ली – मणिपूरसारखा संवेदनशील मुद्दा हा विरोधकांसाठी केवळ राजकीय मुद्दा आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर ते मगरीचे अश्रू ढाळत होते हे आज सिद्ध झाले. त्यांना खरोखर काळजी असते तर त्यांनी यावर चर्चा केली असती, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी विरोधकांवर सडकून टीका केली.
सीतारामन म्हणाल्या की, मणिपूर मुद्द्यावर विरोधकांना चर्चेत भाग घ्यायचाच नाहीये. आज संसदेत हा मुद्दा उपस्थित केला असता विरोधक चर्चेपासून पळ काढताना दिसले. विरोधकांच्या या वागण्याने मला अतीव दु:ख झाले. आज तुम्ही राज्यसभेत पाहिलं की आज सकाळी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा होणार होती. चर्चा सुरू होण्याची वेळ आल्यावर विरोधकांनी सभात्याग केला. हे आधीच ठरलेले होते.
विरोधकांच्या आघाडीचे सदस्य मणिपूरला भेट देऊन आले आहेत. तेथील लोकांशी चर्चा केल्यानंतर या सदस्यांना वास्तव काय आहे ते समजले आहे. त्या विषयावरुन केंद्र सरकारला धारेवर धरता येणार नाही, असे लक्षात आल्यानेच ऐन चर्चेच्या वेळी विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे त्यांना मणिपूरच्या कथित अन्यायाबाबत कसलेही देणेघेणे नाही, हे सिद्ध झाले आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.